जुन्या उड्डाणपुलाच्या पिलर्सना तडे
By Admin | Updated: November 4, 2016 03:01 IST2016-11-04T03:01:39+5:302016-11-04T03:01:39+5:30
वसई पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या जुन्या रेल्वे उड्डाणपूलाच्या पिलर्सना तडे गेले आहेत.

जुन्या उड्डाणपुलाच्या पिलर्सना तडे
शशी करपे,
वसई- वसई पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या जुन्या रेल्वे उड्डाणपूलाच्या पिलर्सना तडे गेले आहेत. माणिकपूर पोलिसांनी पाहणी केल्यानंतर पूलाची तातडीने दुरूस्ती करावी, असे पत्र सार्वजनिक बांधकाम खाते, रेल्वे आणि महापालिकेला दिले आहेत. रेल्वेने मात्र पूल सुरक्षित असून भक्कम असल्याचा दावा केला आहे.
वसई पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा रेल्वे वरील उड्डाणपूल रेल्वेने १९७६ साली बांधला आहे. एकच पूल असल्याने वाहतूकीची प्रचंड कोंडी होत असल्याने या पूलाशेजारीच एमएमआरडीएने नवा पूल बांधला आहे. या पूलाचे काम तब्बल सात वर्षे रखडून पडले होते. शेवटी आॅगस्ट महिन्यात नव्या पूलावरून वाहतूक सुरु करण्यात आली. सध्या जुन्या आणि नव्या पूलावरुन एकेरी वाहतूक सुरु करण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून जुन्या पूलाच्या पिलर्सने तडे गेलच्या तक्रारी वाहन चालकांकडून केल्या जात आहेत. माणिकपूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांनी पिलर्सची पाहणी केली. यावेळी तडे गेल्याचे प्रथमदर्शनी लक्षात आल्यानंतर पाटील यांनी वसई विरार महापालिका, सार्वजनिक बांधकाम खाते आणि रेल्वेला पिलर्सला तडे गेल्याचे दिसून येत असल्याने त्याची दुरुस्ती करण्यात यावी असे कळविले आहे.
जुन्या उड्डाणपूलावरून एकेरी वाहतूक सुरू असून दररोज हजारो वाहनांची ये-जा सुरु आहे. गेल्या चार वर्षांपूर्वी या पूलाला तडे गेलच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या त्यावेळी तत्कालीन आमदार विवेक पंडित यांनी अधिकाऱ्यांना घटनास्थळी नेऊन डागडुजी करुन घेतली होती. त्यानंतर पुन्हा तडे गेल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे वाहन चालकांमध्ये घबराट आहे.पूलाला तडे गेल्याचे दिसत असले तरी रेल्वे प्रशासनाने मात्र तडे पिलर्सना नसून प्लास्टरला गेले आहेत. पिलर्सचा गाभा मजबूत आणि सुरक्षित असल्याचा रेल्वेचा दावा आहे.
>तडे गेल्याचे दिसत असून याप्रकरणी रेल्वे, महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम खात्याला कळवले आहे. तडे प्रकरणात आम्ही जातीने लक्ष ठेऊ आहोत. -अनिल पाटील,
वरिष्ठ पोलीस निरीक्षक
> रेल्वे पूलाचे वार्षिक सर्वेक्षण केले जात असून दुरुस्तीही निमितपणे केली जाते. पूलाला तडे गेलेले नाहीत. पूल सुरक्षित आणि भक्कम आहे. घाबरण्याचे काही कारण नाही.
-एस. मीना, अभियंता, रेल्वे