अधिकारी, कर्मचारी फैलावर
By Admin | Updated: November 4, 2016 02:28 IST2016-11-04T02:28:32+5:302016-11-04T02:28:32+5:30
हागणदारीमुक्तीच्या ९७ हजार ३९८ लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाला दिवसाला ६४९ शौचालये बांधावी लागणार आहेत

अधिकारी, कर्मचारी फैलावर
आविष्कार देसाई,
अलिबाग- हागणदारीमुक्तीच्या ९७ हजार ३९८ लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाला दिवसाला ६४९ शौचालये बांधावी लागणार आहेत, तर महिन्याला १९ हजार ४८० शौचालये उभारण्याचे कठीण काम करावे लागणार आहे. पुढील पाच महिन्यांचे नियोजन करून दस्तुरखद्द मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश नार्वेकर यांनी कमी काम करणाऱ्या तालुक्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. अधिकारी, कर्मचारी यांना फैलावर घेत त्यांना कामाला लावले आहे.
जिल्ह्याला अग्रस्थानी न्यायचे असेल, तर तालुक्यांनी आळस झटकून कामाला लागण्याची गरज निर्माण झाली आहे. अन्यथा कोकण विभागाचे अग्रस्थान डळमळीत होऊन आळशीपणाचे खापर रायगडकरांवर फुटण्याची शक्यता आहे. भारतातील हागणदारीमुक्त जिल्हा होण्याचा मान कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्याने मिळवला आहे. ३१ मार्चअखेर कोकण विभागाने हागणदारीमुक्तीमध्ये अग्रस्थानी राहावे, असे आवाहन मध्यंतरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. सिंधुदुर्गपाठोपाठ रत्नागिरी, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्याचे काम त्या दिशेने सुरु आहे. रायगड आणि पालघर यांच्या टार्गेटमध्ये विशेष फरक नसल्याने दोन्ही जिल्ह्यांना जोर लावून काम करावे लागणार आहे. रायगड जिल्ह्याला ३१ मार्च २०१७ अखेर ९७ हजार ३९८ शौचालये बांधावी लागणार आहेत. त्यानुसार महिन्याला १९ हजार ४८०, तर दर दिवसाला ६४९ शौचालयांची निर्मिती करायची आहे.
३१ डिसेंबर २०१६ पर्यंत म्हसळा, श्रीवर्धन, तळा आणि पोलादपूर या तालुक्यांना अनुक्रमे २७६, ९२६,९८९, १२५० शौचालये उभारावी लागणार आहेत.२६ जानेवारी २०१७ पर्यंत उरण २५९७, महाड ६१३८, मुरुड ४१०२ शौचालये बांधावी लागणार आहेत. १९ फेब्रुवारी २०१७ पर्यंत पनवेल ११०१५, माणगाव ९०३०, खालापूर ७४७६, रोहा ९०२३ तर, ३१ मार्च २०१७ अखेर अलिबाग ११४२१, पेण ११४११, कर्जत १४४५६, सुधागड ७२८८ शौचालये बांधावी लागणार आहेत.
रायगड जिल्ह्याने आघाडी घ्यावी यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी राजेश नार्वेकर यांनी यामध्ये पुढाकार घेतला आहे.
>अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बैठका
रायगड जिल्ह्याने आघाडी घ्यावी यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश नार्वेकर यांनी यामध्ये पुढाकार घेतला आहे. त्यांनी या सर्व तालुक्यांना आपल्या रडारवर घेतले आहे. काम कमी असणाऱ्या तालुक्यात अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बैठका घेऊन त्यांनी त्यांना कामाला लावले असल्याचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी पुंडलिक साळुंखे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. यामुळे निश्चितच रायगड हागणदारीमुक्त होण्यास उपयोग होणार आहे.
>टार्गेट पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांची मदत कमी कामाच्या ठिकाणी घेतली जाणार आहे. राजकीय सहभागाबरोबरच जनसहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यावरही लक्ष केंद्रित करून नियोजित वेळेत लक्ष्य पूर्ण करण्यात येईल.
- राजेश नार्वेकर,
मुख्य कार्यकारी अधिकारी