गावाला हक्काचा इंजिनिअर
By Admin | Updated: November 9, 2014 23:34 IST2014-11-09T21:31:50+5:302014-11-09T23:34:25+5:30
पंचायत सक्षमीकरण अभियान : जिल्ह्यातील २१ ग्रामपंचायतींचा समावेश

गावाला हक्काचा इंजिनिअर
रहिम दलाल - रत्नागिरी स्थानिक विकासाचे केंद्र म्हणून ५०००पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये अभियंत्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील २१ मोठ्या ग्रामपंचायती विकसित करण्यासाठी व त्यांना तांत्रिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी निवड करण्यात आली आहे.
ग्रामपंचायतींमध्ये राबविण्यात येणाऱ्या विकासकामांची अंदाजपत्रके तयार करणे, कामाचे मूल्यांकन करणे आदी कामे पंचायत समिती व जिल्हा परिषदस्तरावर करण्यात येतात. यामध्ये बराच कालावधी जात असल्याने विकासकामे होण्यास फार उशीर होतो. त्यासाठी शासनाने ग्रामपंचायत स्तरावरच विकासकामाचे मूल्यांक होऊन अंदाजपत्रके झाल्यास कामे अधिक सुलभ व लवकर होतील, या हेतूने शासनाने हे पाऊल उचलले आहे.
राजीव गांधी पंचायत सक्षमीकरण अभियानांतर्गत स्थानिक स्वराज्य संस्था अधिक कार्यक्षम करण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार या कंत्राटी पध्दतीने नियुक्त्या करण्यात येणार आहेत. या निर्णयामुळे ग्रामपंचायतीकडून करण्यात येणाऱ्या विविध विकासकामांसाठी हे अभियंते तांत्रिक सल्ल्यासह कामांची अंदाजपत्रके तयार करणार आहेत. त्याचबरोबर त्या कामांची निविदा प्रक्रिया राबवून काम पूर्ण होईपर्यंत देखरेख करणे तसेच कामाच्या मुल्यांकनासह पूर्णत्त्वाचा दाखलाही हे अभियंतेच देणार आहेत. सुमारे ५००० लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये हे अभियंते नियुक्त करण्यात येणार आहेत. जिल्ह्यात ५०००पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या २१ ग्रामपंचायती आहेत. या अभियंत्यांच्या नियुक्त्या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी करणार आहेत. ग्रामपंचायत स्तरावर नियुक्त करण्यात येणाऱ्या अभियंत्यांमुळे विकासकामे लवकर मार्गी लागणार आहेत. त्यामुळे वाडी, वस्त्यांच्या विकासाला चालना मिळणार आहे.
गावच्या विकासासाठी...
अभियंत्यांवरील जबाबदाऱ्या
ग्रामपंचायतीच्या हद्दीतील बांधकामासाठी व इतर प्रस्तावांची तांत्रिक छाननी करणे, कामांची अंदाजपत्रके, निविदा प्रक्रिया करणे, वेळप्रसंगी कामांवर देखरेख करणे, मोजमाप व मुल्यांकन करणे आदी जबाबदाऱ्या या अभियंत्यांना पार पाडाव्या लागणार आहेत.
गावचा विकास गावच्या हाती
ग्रामपंचायतींत अभियंत्यांची नियुक्ती करण्यात येणार असल्याने गावच्या विकासाला चालना मिळणार आहे. ग्रामपंचायतीमध्ये त्या गावची प्रत्यक्ष पाहणी करुन या अंभियत्याला विकास आराखडा तयार करण्यास सोयीचे जाणार आहे. त्यामुळे योग्य प्रकारे गावचा विकास साधला जाणार आहे.
मंडणगड, लांजातील ग्रा. पं. नाही
मंडणगड आणि लांजा या दोन तालुक्यांमध्ये ५ हजारपेक्षा जास्त लोकसंख्या असलेली एकही ग्रामपंचायत नाही. त्यामुळे या दोन्ही तालुक्यामध्ये अभियंता नियुक्तीच्या निकषात एकही ग्रामपंचायत बसत नसल्याने तालुक्यात एकाही ग्रामपंचायतीमध्ये अभियंत्याची नियुक्ती करण्यात येणार नाही.
विकासाचा मार्ग खुला
ग्रामीण भागामध्ये विकासकामे करण्यासाठी ग्रामपंचायतींमार्फत पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेकडे विकासकामांचे प्रस्ताव सादर करण्यात येत होते. त्यामुळे विकासकामे करताना अनेक अडचणींसह बराच कालावधी वाट पाहावी लागत होती. त्यामुळे केंद्रातील तत्कालीन आघाडी शासनाने अभियंते नियुक्त्यांच्या माध्यमातून विकासाचा मार्ग खुला केला आहे.
तालुकाग्रामपंचायत
दापोलीबुरोंडी, गिम्हवणे, दाभोळ,
हर्णै, जालगाव.
खेड भरणे.
चिपळूणपोफळी बुद्रुक, सावर्डे,
गुहागरपाटपन्हाळे, पालशेत. खेर्डी.
संगमेश्वरकडवई, नावडी.
रत्नागिरीपावस, करबुडे, नाचणे, कुवारबाव, गोळप, मिरजोळे, शिरगाव.
राजापूर सागवे.
२१ ग्रामपंचायतींमध्ये होणार अभियंत्यांच्या नियुक्त्या
थेट ग्रामपंचायतीमधून होणार विकास कामे
५००० पेक्षा जास्त लोकसंख्येचा निकष
ग्रामपंचायती होणार तांत्रिकदृष्ट्या सक्षम
गावच्या विकासाला गती मिळणार.