राज्यात अभयारण्यांची संख्या वाढली

By Admin | Updated: August 22, 2015 23:55 IST2015-08-22T23:55:05+5:302015-08-22T23:55:05+5:30

देशात सर्वाधिक अभयारण्य असलेले राज्य हे महाराष्ट्र ठरले आहे. ही संख्या २८वरून ४७वर पोहोचली आहे. अभयारण्यांच्या निर्मितीमुळे वन्यपशू, जंगलाचे संरक्षण करणे सुकर झाले आहे.

The number of sanctuaries in the state increased | राज्यात अभयारण्यांची संख्या वाढली

राज्यात अभयारण्यांची संख्या वाढली

- गणेश वासनिक,  अमरावती
देशात सर्वाधिक अभयारण्य असलेले राज्य हे महाराष्ट्र ठरले आहे. ही संख्या २८वरून ४७वर पोहोचली आहे. अभयारण्यांच्या निर्मितीमुळे वन्यपशू, जंगलाचे संरक्षण करणे सुकर झाले आहे. एकूण ३३ टक्के जंगलक्षेत्रापैकी एकट्या विदर्भात २० टक्के जंगल असल्याने विदर्भावर विशेषत: भर दिला जात आहे.
राज्यात आधी तीनच व्याघ्र प्रकल्प होते. परंतु आता सहा व्याघ्र प्रकल्प निर्माण करण्यात आले असून, वाघ, बिबट, हरीण, रानगवा, रानडुक्कर, नीलगाय आदी वन्यपशूंचे संरक्षण, संगोपन करणे सोयीचे झाले आहे. राज्यातील ४७ अभयारण्यांपैकी विदर्भात २४ अभयारण्ये असल्याने जंगलाची घनता, वन्यपशूंची संख्या निश्चितपणे वाढली आहे. एकीकडे जंगलाचा ऱ्हास होत असल्याच्या घटना पुढे येत असताना विदर्भात सर्वाधिक जंगल, वन्यपशू असल्याची नोंद वनविभागाने घेतली आहे.

मराठवाड्यात जंगलांची टक्केवारी नगण्य
राज्यात ४७ अभयारण्यांची निर्मिती करण्यात आली असली, तरी मराठवाड्यात जंगल हे २ ते ३ टक्के आहे. औरंगाबाद, सोलापूर, सांगली, अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये जंगलाची टक्केवारी फारच कमी असल्याची नोंद करण्यात आली आहे. कोकण, ठाणे, नाशिक, पालघर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, जळगाव या भागांत जंगलक्षेत्र काहीअंशी आहे.

राज्यात सहा व्याघ्र प्रक ल्पांचे संरक्षित व अतिसंरक्षित असे क्षेत्रफळ ७ हजार १९४ चौरस कि.मी. असून, पाच व्याघ्र प्रकल्प हे विदर्भात तर एक सह्याद्री व्याघ्रप्रकल्प हा सातारा, सांगली व कोल्हापूर या तीन जिल्ह्यांमध्ये विस्तारलेला आहे. तसेच कोल्हा मार्ग, मुक्ता भवानी, ममनापूर व मोरगड हे जंगल संवर्धन क्षेत्र म्हणून राखीव ठेवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

अभयारण्याची संख्या वाढल्याने वन्यपशूंच्या संख्येतदेखील वाढ झाली आहे. विशेषत: विदर्भात जंगल अधिक प्रमाणात असल्याने वन्यपशूंच्या संरक्षणाची जबाबदारी वनविभागावर आली आहे.
- दिनेशकुमार त्यागी, क्षेत्र संचालक, मेळघाट व्याघ्र प्रकल्प

सहा व्याघ्र प्रकल्पांचे क्षेत्रफळ असे...
मेऴघाट- २७६७.५२ चौरस कि.मी.
ताडोबा- १७२७ चौरस कि.मी.
पेंच- ७४१ चौरस कि.मी.
सह्याद्री- ११६५ चौरस कि.मी.
नवेगाव बांध-नागझिरा- १९०१ चौरस कि.मी.
बोर- ७९९ चौरस कि.मी.

Web Title: The number of sanctuaries in the state increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.