बिबट्यांची संख्या वाढली
By Admin | Updated: October 1, 2015 02:56 IST2015-10-01T02:56:36+5:302015-10-01T02:56:36+5:30
राज्यात बिबट्यांची संख्या वाढली असून, नागरी वस्त्यांमध्ये त्यांचा संचार धोकादायक ठरू लागला आहे. परिणामी वन्यजीव विभागाने बिबट्यांच्या नियंत्रणासाठी समिती गठित केली आहे.

बिबट्यांची संख्या वाढली
गणेश वासनिक, अमरावती
राज्यात बिबट्यांची संख्या वाढली असून, नागरी वस्त्यांमध्ये त्यांचा संचार धोकादायक ठरू लागला आहे. परिणामी वन्यजीव विभागाने बिबट्यांच्या नियंत्रणासाठी समिती गठित केली आहे.
वनक्षेत्राबाहेर बिबट्यांचे वास्तव्य आढळून येत असल्याच्या पार्श्वभूमीवर डेहरादून येथील वन्यजीव संस्थेने मार्चमध्ये एक सर्वेक्षण केले. बिबट्यांच्या वाढत्या संख्येमुळे नागरी वस्त्यांना धोका निर्माण झाल्याचे त्यात नमूद केले आहे. त्या अनुषंगाने प्रशासनाने वन विभागाच्या मुख्य वनसंरक्षकांना पत्र पाठवून बिबट्यांवर लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.
नागरी वस्त्यांमधून बिबट्याला जेरबंद करताना वन्यजीव संरक्षण कायदा १९७२च्या नियमांचे काटेकोर पालन झाले पाहिजे. बिबट पकडल्यानंतर त्याची माहिती मुख्य वनसंरक्षकांना देणे अनिवार्य करण्यात आले आहे. बिबट्याचे रेस्क्यू आॅपरेशन करताना त्याला इजा होणार नाही याची काळजी घ्यावी लागणार आहे. जेरबंद बिबट्याला प्राणिसंग्रहालयात ठेवताना त्याच्या सूक्ष्म हालचाली अभ्यासासाठी वनाधिकाऱ्यांची नेमणूक करणे अनिवार्य आहे.
जेरबंद करण्यापासून ते प्राणिसंग्रहालयातील वास्तव्यापर्यंतचा बिबट्याचा प्राथमिक अभ्यास केल्यानंतर त्याला परत सोडण्याचा निर्णय घ्यावा लागेल. जंगलात सोडण्यापूर्वी अपर प्रधान मुख्य वनसंरक्षकांना एकूण घडामोडींची माहिती द्यावी लागणार आहे.