‘आप’चे आता मिशन मुंबई
By Admin | Updated: February 11, 2015 06:18 IST2015-02-11T06:18:29+5:302015-02-11T06:18:29+5:30
दिल्लीतील ऐतिहासिक विजयामुळे आम आदमी पार्टीच्या महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांच्या उत्साहाला उधाण आले आहे. दिल्लीच्या विजयानंतर

‘आप’चे आता मिशन मुंबई
मुंबई : दिल्लीतील ऐतिहासिक विजयामुळे आम आदमी पार्टीच्या महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांच्या उत्साहाला उधाण आले आहे. दिल्लीच्या विजयानंतर आता आपच्या नजरा मुंबई महापालिका आणि अन्य स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीकडे वळल्या आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आम्ही तयारीला सुरुवात केली असून, आजच्या निकालाने त्याला आणखी बळ मिळणार असल्याचे ‘आप’च्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य मयांक गांधी यांनी सांगितले.
दिल्लीतील निवडणूक प्रचारात सर्वाधिक एक हजार स्वयंसेवकांचा जत्था मुंबई आणि महाराष्ट्रातील होता. शिवाय सर्वाधिक निधीही राज्यातूनच उभारण्यात आल्याची माहिती गांधी यांनी दिली. मुंबई महापालिका आणि निवडणुकांसाठी आपने यापूर्वीच ‘मिशन विस्तार’ हाती घेतले आहे. आता बूथ पातळीवर कार्यकर्त्यांचा संच उभारण्यावर भर दिला जाईल. २०१७ मध्ये महापालिका निवडणुकीपूर्वी कार्यकर्त्यांचे जाळे तयार केले जाणार असल्याचे गांधी म्हणाले.
आगामी दोन वर्षांत मुंबई महापालिकेसह नवी मुंबई, औरंगाबाद, वसई-विरार, कोल्हापूर आणि कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकांची रणधुमाळी रंगणार आहे. लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर आपने विधानसभा निवडणुकीपासून लांब राहण्याचा निर्णय घेतला. केवळ एकापाठोपाठ निवडणूक लढविणे आमचा
उद्देश नाही. या पराभवानंतर पक्षाला पुन्हा मजबूत करण्यासाठी आम्ही
वेळ घेतला. ‘मिशन विस्तार’
त्याचाच भाग होता. ग्रामीण आणि शहरी भागासाठी पक्षाने स्वतंत्र कार्यक्रम हाती घेतले असून,
मुंबई महानगर क्षेत्रासाठी स्वतंत्र
समिती तयार करण्यात आली आहे. तसेच मुंबईतील ३६ विधानसभा मतदारसंघ आणि २२७ वॉर्डांसाठी स्वतंत्र समित्या स्थापन केल्याचे मयांक गांधी म्हणाले.
शहरी भागात ‘स्वराज अभियान’ राबविण्यात येणार असून, ग्रामीण भागातील प्रश्नांवरही स्वतंत्र समिती असणार आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि शेतमजुरांच्या प्रश्नांच्या माध्यमातून ग्रामीण भागात ‘आप’चा विस्तार केला जाणार आहे. (प्रतिनिधी)