शालेय वाहतूकदार नोटीसांचा घोळ परवाना घेतल्यानंतरही आरटीओ कार्यालयाकडून नोटीसा
By Admin | Updated: July 21, 2016 18:40 IST2016-07-21T18:40:26+5:302016-07-21T18:40:26+5:30
शालेय विद्यार्थी वाहतूक करण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून वाहनांची तपासणी बंधनकारक करण़्यात आली आहे. ही तपासणी 31 मे पूर्वी करण्याचे न्यायालयाचे आदेश होते

शालेय वाहतूकदार नोटीसांचा घोळ परवाना घेतल्यानंतरही आरटीओ कार्यालयाकडून नोटीसा
पुणे : शालेय विद्यार्थी वाहतूक करण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून वाहनांची तपासणी बंधनकारक करण़्यात आली आहे. ही तपासणी 31 मे पूर्वी करण्याचे न्यायालयाचे आदेश होते. त्यानुसार वाहनांची तपासणी करून घेतलेल्या वाहतूकदारांना पुन्हा तपासणी करण़्याच्या नोटीसा आल्या आहेत. त्यामुळे अवघ्या महिन्याभरापूर्वी तपासणी करून पुन्हा तपासणी करायची याबाबत वाहतूकदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, या प्रकरणी या नोटीसा जून 2016 मध्ये पाठविण्यात आल्या होत्या. त्या कदाचित जुलैच्या तिस-या आठवडयात मिळाल्या असल्याने हा गोंधळ झाला असल्याचे सांगण्यात आले.
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, शालेय वाहतूक करणा-या वाहनांची तपासणी प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून तपासणी करून प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे. त्यानुसार, प्रादेशिक परिवहन कार्यालयाने अशा प्रकारे वाहतूक करणा-या सुमारे 2800 वाहनांना नोटीसा बजाविल्या होत्या. त्यातील जवळपास 1400 वाहनांची तपासणी जून अखेर पर्यंत झालेली होती. तर त्यानंतरही ही मुदतवाढविण्यात आली होती. दरम्यान, या सर्व वाहनधारकांना प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून सरसकट नोटीसा बजाविण्यात आलेल्या होत्या. त्या जून महिन्यात पोस्टाने पाठविण्यात आल्या होत्या. त्या गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मिळण्यास सुरूवात झाली आहे. दरम्यान, या मधल्या कालावधीत अनेक वाहनधारकांनी प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून वाहनांची तपासणी करून घेतली आहे. त्या वाहनधारकांनाही वाहनांची फेर तपासणी करून घेण्याच्या नोटीसा आल्या आहेत. त्यामुळे या वाहनधारकांमध्ये संभ्रमाचे वातावरण असून एका महिन्यापूर्वी तपासलेले वाहन पुन्हा तपासून घ्यायचे का असा सवाल हे वाहनधारक उपस्थित करत आहेत.
======
नोटीसा जून महिन्यातील - पाटील
या नोटीसा प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून जून महिन्यात पाठविण्यात आलेल्या आहेत. त्या कदाचित पोस्टाने काही वाहनधारकांना उशीरा मिळालेल्या असतील. त्यामुळे हा गोंधळ झालेला आहे. मात्र, ज्यांनी या वर्षासाठी एकदा तपासणी करून घेतली आहे. त्यांना पुन्हा तपासणी करून घेण्याची गरज नाही. अशा प्रकारे नोटीस आली असेल तर तपासणी प्रमाणपत्र व नोटीस आणून द्यावी, तसेच ज्यांच्याकडे तपासणी केल्याचे प्रमाणपत्र असेल त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जाणार नाही. मात्र, हा प्रकार थोडयाच प्रमाणात घडला आहे. मात्र, ज्या दोषी वाहनांना काही त्रुटींची पूर्तता करण्याच्या अटीवर हे प्रमाणपत्र देण्यात आले आहे. त्यांना तपासणी करून घेणे आवश्यक आहे. जितेंद्र पाटील ( प्रादेशिक परिवहन अधिकारी)