जास्त काहीच नाही; आमचे काम परत द्या!
By Admin | Updated: December 17, 2014 00:29 IST2014-12-17T00:29:31+5:302014-12-17T00:29:31+5:30
आपल्या न्याय्य मागण्या पदरी पाडून घेण्यासाठी धरणे - आंदोलन, लाक्षणिक उपोषण, साखळी उपोषण याद्वारे शासनाचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करण्यात येतो. हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने अशाच

जास्त काहीच नाही; आमचे काम परत द्या!
कामगारांची मागणी : १५ महिलांचे आमरण तर ६० पुरुषांचे साखळी उपोषण सुरू
गणेश खवसे - नागपूर
आपल्या न्याय्य मागण्या पदरी पाडून घेण्यासाठी धरणे - आंदोलन, लाक्षणिक उपोषण, साखळी उपोषण याद्वारे शासनाचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करण्यात येतो. हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने अशाच प्रकारचे चित्र सध्या पटवर्धन मैदानात दिसून येते. तेथे गेल्या नऊ दिवसांपासून १५ महिलांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. परंतु, आतापर्यंत त्यांच्याकडे कुणीही फिरकले नाही. सोबत आणलेले आणि खिशात होते ते पैसेही संपले. आता पुरुषांच्या खाण्याचेही ‘वांधे’ झाले आहेत. येथून जागा सोडली तर मागण्या पूर्ण होणार नाही अन्् येथे थांबतो म्हटले तर उपाशीच थांबावे लागणार... करावे तर काय, अशा पेचात अन्यायग्रस्त कामगार सापडले आहेत. ‘आम्हाला आमचे काम परत द्या’ अशी मागणी त्यांनी केली आहे.
भंडारा जिल्ह्यातील पेंच पाटबंधारेच्या कांद्री उपविभागात पाणी वाटप करण्याचे काम करणाऱ्या कामगारांना २००१ मध्ये कामावरून कमी करण्यात आले. कामावर परत घेण्यात यावे, या मागणीसाठी कामगारांनी जनसमस्या अन्यायग्रस्त समिती संघटनेच्या छताखाली साखळी आणि महिलांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली. अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून त्यांचे आंदोलन सुरू आहे. पवनी तालुक्यातील कांद्री (जि. भंडारा) येथे पेंच पाटबंधारे उपविभागात सुमारे हजार कामगार कामावर होते.
कालव्यातून संबंधित शेतकऱ्याच्या शेतात पाणी सोडण्याचे काम त्यांच्याकडे होते. काम सुरू असताना अचानक कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांना कामावरून कमी करण्यात आले. त्यामुळे उपाशी राहण्याची वेळ या कामगार कुटुंबीयांवर आली. याबाबत बरेचदा निवेदने दिली, आंदोलने केली. परंतु त्याचा काहीएक फायदा झाला नाही. ‘जास्त काहीच नको; आम्हाला आमचे काम द्या’ अशी मागणी या कुटुंबीयांनी केली आहे. शासकीय नोकरीत सामावून घेण्यात यावे, कामावरून कमी केलेल्या कामगारांना १० लाख रुपये मोबदला देण्यात यावा, ज्या कामगाराचा मृत्यू झाला त्याच्या कुटुंबातील एका सदस्याला नोकरीत सामावून घ्यावे, त्याच्या पत्नीला पेन्शन लागू करावी, प्रत्येक कामगार कुटुंबाला बी.पी.एल. कार्ड देण्यात यावे आदी मागण्यांसाठी या कामगारांनी आंदोलन सुरू केले आहे.
आमरण उपोषण करणाऱ्यांमध्ये मैना मुटकुरे, लता झंजाळ, मंजू सवालाखे, रेखा मसरने, सुनीता सवालाखे, समता बशिने, फुलवंता सवालाखे, लता माटे, अनंदा निंबार्ते, शीला हारगुडे, गोपिका भुते, मीरा भोयर, बेबी पुरोहित, विमला भोयर यांचा समावेश आहे. गेल्या नऊ दिवसांपासून त्यांचे आमरण उपोषण सुरू आहे. यापैकी लता झंजाळ या महिलेची तीन दिवसांपूर्वी प्रकृती खालावली होती. त्यामुळे तिला पोलिसांनी लगेच मेडिकलमध्ये भरती केले. तेथे उपचार केल्यानंतर तिने पुन्हा उपोषण सुरू केले. या महिलांसोबतच नानाजी कुथे, सीताराम झंजाळ, चंद्रशेखर मानकर, धरमराम गऱ्हाडे, गजानन बावणे, विठ्ठल मते, प्रमोद घरजाले, ज्ञानेश्वर वैद्य, शेखर झंजाळ, अमर निंबार्ते, देवसिंग नागपुरे, जयदेव झंजाळ, भालचंद्र खरवडे, सहादेव माटे, चंद्रभान झंजाळ, गणेश मसरके, विजय सवालाखे, रामचंद्र पिल्लारे यांच्यासह इतर पुरुष साखळी उपोषण करीत आहेत.
आता पुरुषही आमरण उपोषणाच्या पावित्र्यात
पवनी तालुक्यातील वेगवेगळ्या खेडेगावातून हे कामगार आंदोलनस्थळी आले आहेत. त्यांनी येताना थोडेबहुत पैसे आणले होते. पाच-सहा दिवस पैसे पुरले. चहा-नाश्ता कसातरी भागला. येतानाच तांदळाचा एक कट्टा आणला होता. मात्र तो किती दिवस पुरणार. आता खिशात पैसे नाही अन् तांदूळही संपले. एवढेच काय तर चहा पिण्याकरिता पैसे नाही. गावाला परत जाण्याचाही प्रश्नच आहे. मागणी पूर्ण झालेली नाही. अशात पैशाची जुळवाजुळव करतो म्हटले तर जागा सोडावी लागणार. जागा सोडली तर आंदोलन संपले असे वाटेल. दुसरीकडे जागा सोडली नाही तर पोटात अन्न जाणार नाही. अशा पेचात कामगार सापडले आहेत. मात्र पोटातली भूक पोटातच ठेवून आता महिलांसोबत आपणही आमरण उपोषण सुरू करू, असा निर्धार कामगारांनी केला आहे.