देशाला स्मार्ट सिटी नव्हे, स्मार्ट व्हिलेजची गरज!
By Admin | Updated: February 3, 2015 17:29 IST2015-02-03T02:03:34+5:302015-02-03T17:29:07+5:30
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली़ देशाला स्मार्ट सिटी नव्हे, तर स्मार्ट व्हिलेजची गरज असल्याचे मत हजारे यांनी व्यक्त केले़
देशाला स्मार्ट सिटी नव्हे, स्मार्ट व्हिलेजची गरज!
पारनेर : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व भारत स्वाभिमान चळवळीचे नेते गोविंदाचार्य यांनी राळेगणसिद्धी येथे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली़ देशाला स्मार्ट सिटी नव्हे, तर स्मार्ट व्हिलेजची गरज असल्याचे मत हजारे यांनी व्यक्त केले़
गोविंदाचार्य यांनी यादवबाबा मंदिर, नापासांची शाळा, मीडिया सेंटर, पद्मावती परिसर आणि पाणलोट क्षेत्र विकासाविषयी माहिती घेतल्यानंतर दुपारी हजारे यांच्याशी सविस्तर चर्चा केली़
लोकपालची अंमलबजावणी, भूमी अधिग्रहण विधेयक मागे घ्यावे व काळ्या पैशासंबंधी कार्यवाही या तीन मुद्द्यांवर हजारे यांनी नुकताच मोदी सरकारला आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर या भेटीला विशेष महत्त्व आहे.
बैठकीत लोकपाल, भूमी अधिग्रहण, काळा पैसा आणि ग्रामविकास यासंबंधी चर्चा झाली. ग्रामविकासाच्या मुद्द्यावर गोविंदाचार्य यांनी हजारे यांच्याशी सहमती दर्शवत गांधीजींच्या विचारानेच खरा विकास होऊ शकतो आणि त्यासाठी फुगणारी शहरे व नैसर्गिक साधनसंपत्तीचे शोषण थांबविणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले़
केंद्र सरकारने ग्रामीण भागावर विशेष लक्ष केंद्रित करून स्मार्ट व्हिलेजची योजना राबवायला हवी, अशी सूचना त्यांनी मांडली़ सुमारे ९ महिन्यांचा कालावधी उलटल्यानंतरही केंद्र सरकारचे धोरण सामान्य माणसाच्या हिताचे दिसत नाही, अशी टीका करीत त्यासाठी समविचारी लोकांशी विचारविनिमय करून देशभरात नव्याने संघटन करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. गोविंदाचार्य यांच्यासोबत मुंबई येथील सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र बिस्ट उपस्थित होते. बैठकीनंतर दोघांनी युरोपमधून आलेल्या ४० महाविद्यालयीन तरुणांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांनी मोदी सरकार, भारतासमोरील आव्हाने, भ्रष्टाचारविरोधी चळवळ, तरुणांना प्रेरणा इत्यादी मुद्द्यांवर अण्णांशी चर्चा केली. (प्रतिनिधी)