लोकप्रतिनिधी वृक्षतोड समितीत नाही
By Admin | Updated: September 22, 2016 03:35 IST2016-09-22T03:35:26+5:302016-09-22T03:35:26+5:30
सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी आणि महापालिका अधिकाऱ्यांची समिती नेमण्यात येईल आणि वृक्षतोडीची चौकशी करण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिले

लोकप्रतिनिधी वृक्षतोड समितीत नाही
ठाणे : ठाणे महापालिका हद्दीतील वृक्षतोडीस वृक्ष प्राधिकरण समितीमध्ये सरसकट परवानगी दिल्यानंतर ठाण्यातील शिवसेना खासदार आणि आमदारांनी अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांची भेट घेऊन याबाबत जाब विचारला असता, यासंदर्भात राज्य शासनाची परवानगी घेऊन सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी आणि महापालिका अधिकाऱ्यांची समिती नेमण्यात येईल आणि वृक्षतोडीची चौकशी करण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिले होते. परंतु, महापालिकेच्याच अधिकाऱ्यांची समिती स्थापून प्रशासनाने लोकप्रतिनिधींना यापासून का दूर ठेवले, असा सवाल शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी विचारला आहे. दिलेल्या आश्वासनानुसार लोकप्रतिनिधींना सामावून न घेतल्यास आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला आहे.
सरनाईक यांनी पत्राद्वारे महापालिका हद्दीतील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींवर आपला विश्वास नसेल तर आपण नेमलेल्या अधिकाऱ्यांच्या समितीवर लोकप्रतिनिधींचा विश्वास कसा बसेल, असा प्रश्न अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांना करून समितीमधील अधिकारी स्वत: या प्रकरणाशी संबंधित असल्याने प्रशासनाने मंजूर केलेल्या गोषवाऱ्याला आक्षेप घेणार नाहीत, असे म्हटले आहे.
त्यामुळे मनपा अधिकाऱ्यांच्या समितीमधून सत्य बाहेर येणार नसून वृक्षप्रेमी ठाणेकरांना न्याय मिळणार नसल्याने जर लोकप्रतिनिधींवर विश्वास नसेल तर, महापालिकेने ठाणेभूषण पुरस्काराने सन्मानित केलेले काही मानकरी, अथवा २५ वर्षे ठाणे महापालिकेत पत्रकारिता केलेले ज्येष्ठ पत्रकार किंवा प्रशासकीय सेवेतील अधिकारी हवे असतील, तर केंद्र वा राज्य शासनाच्या पर्यावरण खात्यातील अधिकाऱ्यांची समिती नेमावी, जेणेकरून समितीच्या कार्यपद्धतीत पारदर्शकता येईल, अशी मागणी केली आहे. (प्रतिनिधी)
>...तर शासनाकडे दाद
अटी मान्य नसल्यास आणि सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींवर विश्वास नसल्यास विकासकांशी असलेले आपले अतूट नाते जपण्यासाठी या वृक्षतोडीस सरसकट परवानगी मिळाल्यास नाइलाजास्तव आम्हाला राज्य शासनाकडे दाद मागावी लागेल.