साहित्याचा गंध नसलेले लेखक निवडणुकीत तरबेज
By Admin | Updated: January 18, 2016 00:58 IST2016-01-18T00:58:55+5:302016-01-18T00:58:55+5:30
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांना साहित्याचा गंधही नाही. हे पदाधिकारी निवडणुकीत मात्र तरबेज आहेत, अशी टीका ज्येष्ठ कवी विठ्ठल वाघ यांनी केली.

साहित्याचा गंध नसलेले लेखक निवडणुकीत तरबेज
प्रज्ञा केळकर-सिंग, ज्ञानोबा-तुकारामनगरी (पिंपरी)
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांना साहित्याचा गंधही नाही. हे पदाधिकारी निवडणुकीत मात्र तरबेज आहेत, अशी टीका ज्येष्ठ कवी विठ्ठल वाघ यांनी केली.
साहित्य संमेलनात शरद पवार यांच्या मुलाखतीस उपस्थित असलेल्या वाघ यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले, की शरद पवार यांनी संमेलनाध्यक्ष आणि निवडणुकीबाबत घेतलेली भूमिका योग्य आहे.
या विषयी वाघ म्हणाले, ‘‘भ्रष्ट कारभारामुळेच थोर विचारवंत आणि साहित्यिक संमेलनाच्या अध्यक्षपदापासून दूर राहतात. कारण, महामंडळाची निवडणुकीची पद्धत चुकीची आहे. साहित्याशी संबंध नसलेल्या लोकांच्या ताब्यात महामंडळ आहे. साहित्याशी त्यांना काही घेणे- देणे नाही. ही मंडळी साहित्यात तरबेज नसली, तरी निवडणुकांमध्ये तरबेज आहे. अशा लोकांच्या हाती महामंडळाचे भविष्य आहे, हे दुर्दैव आहे,’’ अशी टीका त्यांनी केली.