मुख्यमंत्र्यांवर कुणाचा ‘रिमोट कंट्रोल’ नको!
By Admin | Updated: December 2, 2014 00:38 IST2014-12-02T00:38:54+5:302014-12-02T00:38:54+5:30
राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात चांगले काम करायची क्षमता आहे. जर त्यांच्यावर कुणाचा ‘रिमोट कंट्रोल’ नसला तर ते राज्याला देशाचा ‘हेडमास्टर’ बनवतील या शब्दांत

मुख्यमंत्र्यांवर कुणाचा ‘रिमोट कंट्रोल’ नको!
अण्णा हजारे : नरेंद्र मोदी यांनी जनतेची दिशाभूल केल्याची टीका
नागपूर : राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात चांगले काम करायची क्षमता आहे. जर त्यांच्यावर कुणाचा ‘रिमोट कंट्रोल’ नसला तर ते राज्याला देशाचा ‘हेडमास्टर’ बनवतील या शब्दांत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी अप्रत्यक्षपणे सरकारवर असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रभावावर टीका केली. नागपुरातील धनवटे नॅशनल कॉलेज येथे आयोजित कार्यक्रमप्रसंगी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
अण्णा हजारे यांनी नरेंद्र मोदी यांच्यावरदेखील हल्लाबोल केला. मोदी हे बोलतात खूप, परंतु कृतीमधून ते प्रत्यक्षात उतरत नाही. परदेशातील बँकांमध्ये असलेला भारतीयांचा काळा पैसा १०० दिवसांत परत आणणे शक्य नाही हे मोदींना माहीत होते. परंतु तरीदेखील त्यांनी मतांसाठी खोटे आश्वासने देऊन जनतेची दिशाभूल केली असे हजारे म्हणाले. मोदी यांनी आपण पाठविलेल्या पत्राची योग्य ती दखल घेण्यात आली नसल्याची खंतदेखील त्यांनी बोलून दाखविली.
सरकारची खुर्ची संकटात आली तरच आंदोलनाची दखल घेतली जाते. त्यामुळे जर एखादा बदल घडवून आणायचा असेल तर जनतेने मोठ्या प्रमाणात संघटित व्हायला हवे असे ते म्हणाले. जवखेडे येथे झालेल्या दलित हत्याकांडाची त्यांनी निंदा केली. असे प्रकार थांबविण्यासाठी जनतेनेच पुढाकार घेऊन सामाजिक सलोखा वाढवला पाहिजे असे ते म्हणाले. याप्रसंगी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते उमेश चौबे व धनवटे नॅशनल कॉलेजचे प्राचार्य डॉ.बबन तायवाडे उपस्थित होते. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी यावेळी हजारे यांच्याशी संवाद साधला. विद्यार्थ्यांना त्यांनी स्वत:चा संघर्ष व नेमकी स्फूर्ती कुठून मिळते याबाबत माहिती दिली. तसेच तरुणांनी समाजासाठी चांगली कामे करून देशविकासाला हातभार लावावा असे आवाहन केले. (प्रतिनिधी)
शेतकऱ्यांसाठी देशपातळीवर लढा उभारण्याचा विचार
स्वातंत्र्याच्या ६८ वर्षांनंतरही शेतकऱ्याला आत्महत्या करावी लागते ही दुर्दैवी बाब आहे. शेतकऱ्यांची अवस्था ‘माल खाये मदारी ; नाच करे बंदर’ अशी झाल्याची टीका त्यांनी केली. ‘राईट टू रिजेक्ट’ आणि ‘राईट टू रिकॉल’ या दोन गोष्टींनंतर देशपातळीवर शेतकऱ्यांचा लढा उभारणार असल्याचे अण्णांनी स्पष्ट केले. शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांच्या आंदोलनाचीदेखील त्यांनी प्रशंसा केली.
निवडणुका घटनाबाह्य
दरम्यान, यावेळी अण्णा हजारे यांनी देशात घेतल्या जाणाऱ्या निवडणुका घटनाबाह्य असल्याचा आरोप लावला. घटनेमध्ये निवडणुकांमध्ये पक्षाचा कुठेही उल्लेख नाही. केवळ व्यक्ती निवडणुका लढू शकतात, असे नमूद आहे. मग पक्ष कसे काय निवडणुकांत उतरतात? समूहांमुळेच भ्रष्टाचार वाढीस लागला आहे. यासंदर्भात निवडणूक आयोगही कारवाई करण्यास धजावत नाही, असा आरोप हजारे यांनी लावला. विद्यार्थ्यांनी अण्णांना अभ्यासू प्रश्न विचारून ‘गुगली’ टाकली.
केजरीवाल परत आले तर स्वागतच
अरविंद केजरीवाल यांच्या डळमळीत कारभारामुळे आंदोलनाचे नुकसान झाले का, असे विचारले असता त्यांच्याबद्दल काहीच बोलणार नसल्याचे त्यांनी सांगितले. जर केजरीवाल आंदोलनात परत जुळले तर त्यांचे स्वागत करील. पण मी कुठल्याही पक्षासोबत जाणार नाही. वेगळ्या विदर्भाच्या मुद्यावर त्यांनी मौन साधले.