वर्धेतून मेघे कुटुंबातून कुणीही लढणार नाही
By Admin | Updated: June 23, 2014 01:19 IST2014-06-23T01:19:41+5:302014-06-23T01:19:41+5:30
आपण ५ जुलै रोजी भाजपमध्ये विनाशर्त प्रवेश करणार आहेत. आपण भाजपकडे कुठलेही पद किंवा तिकिटाची मागणी केलेली नाही. वर्धा लोकसभेंतर्गत येणाऱ्या कुठल्याही विधानसभा मतदारसंघातून

वर्धेतून मेघे कुटुंबातून कुणीही लढणार नाही
दत्ता मेघे यांची स्पष्टोक्ती : नागपुरात समीरबाबत निर्णय गडकरी घेतील
नागपूर : आपण ५ जुलै रोजी भाजपमध्ये विनाशर्त प्रवेश करणार आहेत. आपण भाजपकडे कुठलेही पद किंवा तिकिटाची मागणी केलेली नाही. वर्धा लोकसभेंतर्गत येणाऱ्या कुठल्याही विधानसभा मतदारसंघातून पुत्र सागर किंवा समीर यापैकी कुणीही निवडणूक लढविणार नाहीत. नागपुरातून समीरला उमेदवारी द्यायची की नाही याबाबतचा अंतिम निर्णय भाजपचे राष्ट्रीय नेते नितीन गडकरी घेतील, आमचा कुठलाही आग्रह नाही, असे माजी खा. दत्ता मेघे यांनी स्पष्ट केले आहे.
लोकसभा निवडणुकीत वर्धेतून काँग्रेसच्या तिकिटावर रिंगणात उतरलेले सागर मेघे यांना पराभवाला सामोरे जावे लागले. यानंतर माजी खा. दत्ता मेघे यांनी भाजपमध्ये प्रवेश घेण्याचा निर्णय जाहीर केला. मेघेंचा भाजप प्रवेश व पुत्र सागर- समीर यांच्या राजकीय पुनर्वसनाच्या चर्चेमुळे भाजपमध्ये अस्वस्थता वाढली होती.
सागर यांनी देवळीतून विधानसभेची तर समीर हे पुढील वर्षी स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लढवावी, असा फार्म्युला भाजपमधील काही नेत्यांनी पक्षश्रेष्ठींसमोर मांडला होता. याबाबत ‘लोकमत’शी बोलताना दत्ता मेघे म्हणाले, वर्धेत रणजित कांबळे, चारुलता टोकस यांनी आपल्याला मानसिक त्रास दिला. प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी यवतमाळात होणारी प्रायमरी निवडणूक वर्धेवर ढकलली. माझी गडकरींशी असलेली मैत्री मी कधीच लपविली नाही. वर्धेतील काँग्रेस नेत्यांनी याचे भांडवल करीत दिल्लीत काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे आपल्याविरोधात लॉबिंग केले. यामुळे आपण भाजप प्रवेशाचा निर्णय घेतला.
यापुढे सागर हे वर्धेत विधायक कामे करतील. पराभव झाला असला तरी कार्यकर्त्यांना वाऱ्यावर न सोडता त्यांचे प्रश्न सोडवतील. भाजपचा प्रचार करतील. तेथील भाजपच्या जुन्या लोकांना आपल्यामुळे कुठलाही त्रास होणार नाही, याची काळजी घेतील.
आपण आपला जास्तीत जास्त वेळ नागपुरात देऊ. पुत्र समीर यांना नागपुरातून विधानसभेत उतरवायचे की नाही, कोणत्या मतदारसंघात लढवायचे याबाबतचा अंतिम निर्णय गडकरी घेतील. त्यांचाच निर्णय अंतिम असेल. मी कार्यकर्त्यांना जपत आलो आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांना बाजूला सारून मुलाला पुढे करणे मलाच योग्य वाटत नाही, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)