‘मेक इन इंडिया’तील पुढचे ठिकाण औरंगाबाद
By Admin | Updated: August 22, 2015 00:30 IST2015-08-22T00:30:55+5:302015-08-22T00:30:55+5:30
मेक इन इंडिया या पंतप्रधानांच्या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमातहत औरंगाबाद हे पुढचे ठिकाण असेल. शेंद्रा-बिडकीनचा दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर

‘मेक इन इंडिया’तील पुढचे ठिकाण औरंगाबाद
मुंबई : मेक इन इंडिया या पंतप्रधानांच्या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमातहत औरंगाबाद हे पुढचे ठिकाण असेल. शेंद्रा-बिडकीनचा दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर (डीएमआयसी) प्रकल्पात समावेश असल्याने आगामी काळात औरंगाबाद हे गुंतवणुकीचे केंद्र म्हणून उदयास येईल. स्मार्ट सिटी प्रस्तावातहत डीएमआयसी प्रकल्पावर भर दिला जाण्याची शक्यता आहे, असे नागरी विकास विभागाच्या सचिव मनीषा म्हैसकर यांनी सांगितले.
केंद्र सरकारच्या ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पासाठी महाराष्ट्रातून निवड कण्यात आलेल्या दहा शहरांसाठी राज्य सरकारने आयएएस अधिकाऱ्यांची तज्ज्ञ सल्लागार (मेन्टॉर) म्हणून नियुक्ती केली असून औरंगाबादसाठी अपूर्वा चंद्रा (उद्योग आणि ऊर्जा विभागाच्या मुख्य सचिव) यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. स्मार्ट सिटीसाठी देशभरातील अन्य ९० शहरांसोबत राज्यातील दहा शहरे असल्याने तज्ज्ञ सल्लागार नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला.
स्मार्ट सिटी म्हणून विकसित करण्यासाठी महाराष्ट्रातून मुंबई, ठाणे, पुणे-पिंप्री-चिंचवड, कल्याण-डोंबिवली, नाशिक, नागपूर, अमरावती, सोलापूर आणि औरंगाबादची निवड करण्यात आली. स्मार्ट सिटीच्या स्पर्धेत शेवटपर्यंत टिकून राहण्यासाठी या शहरांना स्वत:ची योजना तयार करावी लागणार आहे, त्यासाठी अनुभवी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची मार्गदर्शक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, असे नागरी विकास विभागाच्या सचिव मनीषा म्हैसकर यांनी सांगितले.नियुक्त करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांना संबंधित शहराची सखोल माहिती असावी आणि त्यांनी यापूर्वी संबंधित शहरात किंवा महापालिकेत काम केलेले असावे, याची दक्षता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे, असे म्हैसकर यांनी सांगितले.
दहा शहरांचे मेन्टॉर....
अपूर्वा चंद्रा-औरंगाबाद, नितीन करीर-पुणे-पिंप्री-चिंचवड, अजय मेहता-मुंबई, मनूकुमार श्रीवास्तव-ठाणे, संजय भाटिया-नवी मुंबई, यू.पी.एस. मदान-कल्याण-डोंबिवली, प्रवीण परदेशी- नागपूर, मिलिंद म्हैसकर-सोलापूर.
देशभरात १०० स्मार्ट शहरे विकसित करण्यासाठी केंद्राची ४८ हजार कोटी रुपये खर्चाची योजना आहे.