गुटखाबंदीनंतर पुढचे लक्ष्य मावाबंदी

By Admin | Updated: May 31, 2014 22:04 IST2014-05-31T21:43:05+5:302014-05-31T22:04:36+5:30

पुढच्या टप्प्यात तंबाखुपासून बनविल्या जाणार्‍या माव्यावर बंदी घालण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे अशी माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त महेश झगडे यांनी दिली.

Next goal after gossiping | गुटखाबंदीनंतर पुढचे लक्ष्य मावाबंदी

गुटखाबंदीनंतर पुढचे लक्ष्य मावाबंदी

महेश झगडे यांचे प्रतिपादन : जागतिक तंबाखू विरोधी दिन
पुणे : राज्य शासनाने लागू केलेल्या गुटखा, पानमसाला व सुगंधी सुपारीवरील बंदीनंतर देशात सर्वाधिक ३३ कोटी रूपयांचा गुटखा महाराष्ट्रात जप्त करण्यात आला आहे, आता पुढच्या टप्प्यात तंबाखुपासून बनविल्या जाणार्‍या माव्यावर बंदी घालण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे अशी माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त महेश झगडे यांनी दिली.
जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त मुक्तांगण संस्थेमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अनिल अवचट, मुक्तांगणच्या संचालिका मुक्ता पुणतांबेकर उपस्थित होत्या. कार्यक्रमानंतर झगडे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
झगडे म्हणाले, 'राज्य शासनाने १८ जुलै २००८ पासून राज्यात गुटखा बंदी लागू केली, त्यापूर्वी २००२ मध्ये लागू केलेली गुटखाबंदी न्यायालयाने उठविली होती. त्यामुळे यावेळेस गुटखाबंदी लागू करताना ती न्यायालयामध्ये टिकेल, याचा विचार करण्यात आला. त्यामुळे त्याचवेळी सरसकट तंबाखूवर बंदी घालण्यात आली नाही. सिगारेट ही अन्न या सदरात येत नसल्याने त्यावर बंदी घालण्याचा अधिकार कायद्यानुसार अन्न व औषध प्रशासनास नाहीत त्यामुळे त्यावर बंदी घालण्यात कायदेशीर अडचण निर्माण झाली. पहिला टप्पा म्हणून गुटख्यावर बंदी घातली गेली. पुढील टप्प्यात माव्यावर बंदी घालण्याचे लक्ष्य आहे.'
मुक्तांगणमध्ये व्यसनांवर उपचार घेत असलेल्या रूग्णांशी झगडे यांनी संवाद साधला. व्यसनांशी लढा देऊन त्यामधून बाहेर पडणार्‍यांनी त्यांचे संघटन उभारून व्यसनांविरूध्द संघटितपणे लढा द्यावा, अशी सूचना झगडे यांनी केली.
औषधे बाद ठरत आहेत
विविध रोगांवर पूर्वी हमखास चालणारी औषधे आता दाद देईनाशी झाली आहेत, त्यातच १९८७ नंतर नवीन औषधांचा दुष्काळ निर्माण झाला आहे. डॉक्टरांच्या प्रिस्क्रप्शिन शिवाय औषधे घेण्यातून असे प्रकार घडत आहेत. औषधे बाद ठरण्याचा प्रकार हा ग्लोबल वार्मिंगपेक्षा घातक ठरू शकेल, अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली असल्याची माहिती झगडे यांनी दिली.
तब्बल ३५ टक्के लोकांकडून तंबाखू सेवन
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने केलेल्या शास्त्रीय अभ्यासानुसार देशभरातील तब्बल ३५ लोकांकडून तंबाखू सेवन केले जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामध्ये २१ टक्के लोक हे तंबाखू खातात तर ९ टक्के लोक धुम्रपान करतात, ५ टक्के जण दोन्हीमध्ये सहभागी आहेत, अशी माहिती झगडे यांनी दिली.

Web Title: Next goal after gossiping

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.