सोशल मीडियासाठी हवा नवा कायदा
By Admin | Updated: March 25, 2015 00:28 IST2015-03-25T00:28:19+5:302015-03-25T00:28:19+5:30
माहिती तंत्रज्ञान कायद्यातील ६६ अ कलम रद्द केले हा प्रतिबंधात्मक उपाय ठरणार असला तरीही त्याऐवजी तत्काळ नवा कायदा किंवा नव्या तरतुदी करून सोशल मीडियावर वचक ठेवणारे आणायला हवे होते.

सोशल मीडियासाठी हवा नवा कायदा
पुणे : माहिती तंत्रज्ञान कायद्यातील ६६ अ कलम रद्द केले हा प्रतिबंधात्मक उपाय ठरणार असला तरीही त्याऐवजी तत्काळ नवा कायदा किंवा नव्या तरतुदी करून सोशल मीडियावर वचक ठेवणारे आणायला हवे होते. गुगल, फेसबुक, ट्विटर यासारख्या कंपन्यांना ना पोलिसांचा धाक राहिला, ना आक्षेपार्ह किंवा वादग्रस्त पोस्ट डीलिट करण्यासाठी कायदा-सुव्यवस्था राखणाऱ्या यंत्रणांची धास्ती राहिली नाही. सोशल मीडियाचे मैदान खुले झाल्याने त्याचा गैरवापर होणार हे निश्चित, असे मत कायदेतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
कलम ६६ अ : एखाद्यास बदनामीकारक संदेश पाठविणं - जर एखाद्या व्यक्तीनं बदनामीकारक, खोडकर संदेश किंवा खोटी माहिती पसरविल्यास त्याला ३ वर्षांपर्यंत कैद आणि दंड होऊ शकतो.
हे कलम तात्पुरत्या स्वरूपात रद्द करण्यात आले आहे. याऐवजी तातडीने नवा कायदा आणणे ही शासनाची जबाबदारी आहे. ६६ अमुळे किमान नागरिक काहीही कमेंट करण्यापूर्वी विचार करीत होते. चुकीचे लिहिण्यापूर्वी धजावत नव्हते. आता मात्र कोणाचे
काहीही वचक नसल्याने नागरिक बेछूटपणे याचा वापर करीत राहणार हे निश्चित. सोशल मीडियावरून होणारे गुन्हे रोखण्यासाठी योग्य पद्धतीने नियमांची बांधणी करून पुन्हा सुधारित कलमाचा कायद्यात समावेश करायला हवा होता. त्यामुळे कलम ‘६६ अ’ आपसूकच रद्द झालं असतं.
- प्रो. सपना देव,
सायबर लॉ
माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६ मध्ये २००८ मध्ये बदल करण्यात आले होते. त्यापूर्वी हे कलम केवळ हॅकिंगशी निगडित होते. मात्र २००८ मध्ये त्यात बदल करून ६६ (अ ते एफ) या कलमांचा अंतर्भाव करण्यात आला. यातील मुद्दे स्पष्ट तसेच संवैधानिक ही नव्हते. या कलमामुळे कोणी लाईक किंवा कमेंट केले तरी त्यांना अटक होत असे. खऱ्या अर्थाने चुकीची विधाने करणाऱ्यांपेक्षा या कलमाचा गैरवापरच वाढलेला होता. मात्र हे कलम रद्द झाल्याने सोशल मीडियावर काहीही आक्षेपार्ह टाकता येईल, असा गैरसमज वापरकर्त्यांनी करू नये, कारण कलम ६६ चे इतर एफपर्यंतचे कलम तसेच अन्य माहिती तंत्रज्ञान कलमांद्वारे अशा कृत्यांवर आळा घालता येणार आहे. - अॅड. गौरव जाचक
सध्या सोशल मीडिया फोफावला आहे. त्यामुळे त्याच्यावर जरब ही हवीच. सामाजिक शांती भंग होण्याच्या अनेक घटना घडत असतात. रिकामटेकडे लोक त्याचा वापर करून शांतता भंग करतात. त्यामुळे नवीन कायदा अस्तित्वात यायला हवा.- अॅड. प्रताप परदेशी
४सोशल मीडियातून एखाद्या महिलेवर अश्लील भाष्य करणारा फोटो किंवा व्यंग्यचित्र पोस्ट केल्यावर संबंधितावर पोलीस कुठल्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करणार?
४स्वातंत्र्यसैनिक, धर्मगुरू किंवा एखाद्या संघटनेच्या प्रतिष्ठित व्यक्तीविरोधात अतिशय खालच्या पातळीवर टीका-टिप्पणी किंवा फोटो पोस्ट कमेंट केली असेल तर पोलीस काय कारवाई करणार?
४धर्माशी संबंधित असलेल्या एखाद्या गोष्टीच्या बाजूने किंवा विरोधात लिहिल्याने दंगल उसळली तर काय कारवाई होणार?
४प्रतिष्ठित पदाधिकाऱ्यांविरोधात अर्वाच्च, अश्लील, शिवराळ भाषेत लिहिले गेल्यास काय करणार?