ना टीका केली, ना अपमान झाला!
By Admin | Updated: November 1, 2015 01:29 IST2015-11-01T01:29:21+5:302015-11-01T01:29:21+5:30
‘सत्ता की स्वाभिमान यात मला नेहमीच स्वाभिमान प्यारा असेल, पण शिवसेनेकडून अलीकडे झालेल्या टीकेमुळे मला अपमान झाल्याचे वाटत नाही,’ असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज

ना टीका केली, ना अपमान झाला!
मुंबई : ‘सत्ता की स्वाभिमान यात मला नेहमीच स्वाभिमान प्यारा असेल, पण शिवसेनेकडून अलीकडे झालेल्या टीकेमुळे मला अपमान झाल्याचे वाटत नाही,’ असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आपल्या सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त शिवसेनेसमोर मैत्रीचा हात पुढे केला. भाजपा आणि शिवसेनेचे सरकार दुसरे वर्षही सोबतच पूर्ण करेल, असे ते म्हणाले.
फडणवीस यांनी काल कल्याणमधील सभेत शिवसेनेवर सडकून टीका केली होती. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांना शब्दांनी ठोकून काढले होते. मात्र, ही कटुता दोन महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने होती, ती संपली असल्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले. ते पत्रकारांशी बोलत होते.
आपण शिवसेनेच्या जबड्यातील दात मोजण्याची भाषा केली. एकमेकांवरील टीकेचा सरकारच्या स्थैर्याला फटका बसणार नाही का, या पत्रकारांच्या प्रश्नात त्यांनी, ‘मी कोणती टीका केली?’ असा प्रतिप्रश्न पत्रकारांना करीत, त्यांनी वादावर पडदा टाकण्याची भूमिका एकप्रकारे घेतली. शिवसेनेकडून टीका झाल्याचे आपण ऐकलेले नाही. कोणी माझ्यावर चिखल फेकला नाही आणि तो माझ्या अंगावर पडलादेखील नाही.
आरक्षणाबाबत भूमिका
धर्माच्या आधारावर आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने अमान्य केले आहे. त्यामुळे मुस्लीम समाजाला आरक्षण देण्यात अडचणी आहेत, असे सांगून मुस्लिमांच्या विकासासाठी सरकारने केलेल्या उपाययोजनांची माहिती त्यांनी दिली. मराठा समाजाच्या आरक्षणाला न्यायालयात आव्हान दिले आहे. हे आरक्षण मिळालेच पाहिजे, या भूमिकेतून शासनाने मंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेली समिती नियमितपणे या भूमिकेचा पाठपुरावा करीत आहे. धनगर समाजाला आरक्षण देण्याबाबत केंद्र सरकारकडे आग्रही भूमिका मांडण्यासाठी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसकडून अहवाल मागविण्यात येत आहे. त्या आधारे केंद्राकडे आरक्षणासाठी भक्कम बाजू मांडली जाईल, असे ते म्हणाले.
गिरणी कामगारांची घरे
गिरणी कामगारांसाठीची घरे तयार आहेत. त्यांची किंमत ठरविण्याचे काम आता अंतिम टप्प्यात आहे. परवडणाऱ्या घरांबाबतचे (किमतींसह) धोरण लवकरच जाहीर केले जाईल. पुढच्या आॅक्टोबरपर्यंत मुंबईत सगळीकडे सीसीटीव्ही बसविण्यात येतील, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी एका प्रश्नात दिली.
डाळ आयातीची अनुमती
तूरडाळीच्या साठ्यांवर केंद्र व राज्य सरकारने निर्बंध आणल्याने, जहाजांद्वारे मुंबईच्या बंदरात येणारी तूरडाळ उतरविण्यात अडचण आली आहे. ही डाळ बंदरामध्ये उतरवू द्यावी, पण तिच्या साठ्याबाबत आणि टप्प्याटप्प्याने ती बाजारात आणण्याबाबत अटी घातल्या पाहिजेत, अशी भूमिका आपण केंद्र सरकारला कळविली असल्याचे त्यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)
पुरावे द्या नाहीतर माफी मागा : फडणवीस नावाची एक व्यक्ती मुंबईतील पंचतारांकित हॉटेल्समध्ये बसून, मोठे व्यवहार करीत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला होता. याबाबत मुख्यमंत्र्यांनी ‘पुरावे द्या, नाहीतर माफी मागा,’ असे सांगितले. राष्ट्रवादीची अवस्था सध्या ‘खिसयानी बिल्ली खंबा नोचे’सारखी झाली आहे. सिंचनामध्ये कोणी पैसा खाल्ला, हे महाराष्ट्रातील लहान मुलगादेखील सांगेल, असा टोला मुख्यमंत्र्यांनी हाणला.
माझ्यासाठी माझ्या शहराची बदनामी का?
मुख्यमंत्र्यांचे शहर नागपूर हे क्राइम कॅपिटल झाले असल्याची टीका सध्या केली जात आहे. याकडे लक्ष वेधले असता, ‘मला लक्ष्य करायचे असेल तर जरूर करा, पण माझ्या शहराला बदनाम का करता,’ असा भावनिक प्रश्न मुख्यमंत्र्यांनी केला. नागपूरमध्ये गुन्हेगारी वाढली, हा आरोप मुळातच चुकीचा आहे. टीका करायची असेल तर माझ्यावर करा ना.. कोणतीही हरकत नाही, पण उगाच माझ्या नागपूरला बदनाम करण्यात येते, याचे दु:ख वाटत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.