विकासकामांना लागणार कात्री?
By Admin | Updated: June 8, 2014 00:53 IST2014-06-08T00:53:56+5:302014-06-08T00:53:56+5:30
महापालिकेच्या उत्पन्नाचा कणा असलेला स्थानिक संस्था कर (एलबीटी) रद्द करण्याच्या हालचाली राज्य शासनाने सुरू केल्या आहेत.

विकासकामांना लागणार कात्री?
धोक्याची बाब : कशी होईल प्रवाशांची सुरक्षा?
नागपूर : भारतीय रेल्वेत आगीवर नियंत्रण मिळविण्याकरिता ब्रिटिश काळापासून स्वतंत्र अग्निशमन विभाग तयार केला गेला होता. परंतु रेल्वे प्रशासनाने हा विभागच बंद केल्याचे धक्कादायक वास्तव आहे. चक्क अग्निशमन विभागच हरविल्याने रेल्वेच्या वेगवेगळ्या विभागात आग लागल्यास ती विझविणार कोण? हा गंभीर प्रश्न असून यामुळे प्रवाशांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.
नागपूर रेल्वेस्थानकाच्या पश्चिमेकडील भागात असलेल्या चालू तिकीट कार्यालयाला आग लागून मोठे नुकसान झाले होते. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानीची घटना घडली नाही. भारतीय रेल्वेत इंग्रजांच्या काळापासून रेल्वेत लागलेल्या आगींवर नियंत्रण मिळविण्यासाठी स्वतंत्र अग्निशमन विभाग अस्तित्वात होता. हा विभाग सुरक्षा विभागांतर्गत कार्यरत होता. सुरक्षा आयुक्त दर्जाचा अधिकारी या विभागाचा प्रमुख होता. या विभागाचे कामकाजही स्वतंत्र असायचे. आगीची सूचना मिळताच या विभागाची रेल्वेगाडी पाण्याच्या बंबासह घटनास्थळी पोहोचायची. मात्र, १९९६ साली या अग्निशमन विभागाचे रेल्वे सुरक्षा दलात विलिनीकरण करण्यात आले. तेव्हापासून आगीच्या घटनांवर अंकुश लावण्यासाठी रेल्वेत स्वतंत्र विभागच अस्तित्वात नाही. देशात सर्वाधिक प्रवासी रेल्वेच्या प्रवासाला पसंती देतात. नागपूर रेल्वेस्थानकावर दररोज ५0 ते ६0 हजार प्रवासी ये-जा करतात. त्यामुळे एखाद्या प्रसंगी मोठी आग लागल्यास मोठा पेचप्रसंग निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. धावत्या रेल्वेगाडीतही आगीवर नियंत्रण मिळविण्याची कुठलीच यंत्रणा कार्यरत नाही. त्यामुळे आग लागल्यास नजीकच्या अग्निशमन विभागावर अवलंबून राहण्याची पाळी रेल्वेवर येते. एखाद्या वेळी मदत मिळण्यास उशीर झाल्यास मोठी जीवितहानी होण्याची शक्यता निर्माण होते.
कर्मचार्यांना हाताळता येत नाहीत उपकरण
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील काही कार्यालयात रेल्वेने अग्निशमन उपकरणे लावली आहेत. परंतु कर्मचार्यांना ही उपकरणेच कशी हाताळावी, याचे ज्ञान नसल्यामुळे आग लागल्यास आणि अग्निशमन उपकरण असूनही त्याचा काहीच लाभ न होण्याची शक्यता आहे. माजी महाव्यवस्थापक सुबोध जैन यांनी नागपूरचा दौरा केला असताना त्यांनी बेस किचनला भेट दिली. तेथे स्वयंपाक तयार करणार्या एका कामगाराला त्यांनी अग्निशमन उपकरण हाताळून दाखविण्याची मागणी केली.
मात्र आपल्याला ते कसे हाताळावे, याची माहिती नसल्याचे या कामगाराने सांगितल्यानंतर ते चांगलेच संतापले होते. त्यामुळे कर्मचार्यांना अग्निशमन उपकरण हाताळण्याचे प्रशिक्षण देणेही तेवढेच गरजेचे आहे.
लोहमार्ग पोलीस ठाण्यातही अग्निशमन उपकरण
रेल्वेस्थानकावरील लोहमार्ग पोलीस ठाण्यातही अग्निशमन उपकरण नाही. पोलीस ठाण्यात अनेक वर्षांंपूर्वीच्या जुन्या फाईल्स, मालखाना आहे. आग लागल्यास पोलिसांचे सर्व महत्त्वाचे दस्तऐवज जळून खाक होण्याची भीती आहे. परंतु चालू तिकीट कार्यालयाला आग लागल्यानंतरही लोहमार्ग पोलिसांनी त्यापासून धडा घेतलेला दिसत नाही.
काऊंटर सुरू होण्यास लागणार १५ दिवस
चालू तिकीट कार्यालयातील काऊंटरला आग लागल्यामुळे चालू तिकिटांचे काऊंटर बाजूलाच असलेल्या आरक्षण कार्यालयात हलविण्यात आले आहे. या घटनेत एक लाखाचे नुकसान झाले असून, काऊंटर पूर्ववत सुरू करण्यासाठी काम सुरू करण्यात आले आहे. १५ दिवसांत हे काऊंटर सुरू होतील, अशी माहिती ‘डीआरएम’ ओ. पी. सिंह यांनी दिली.(प्रतिनिधी)