दुष्काळासाठी तिजोरी उघडण्याची गरज
By Admin | Updated: September 2, 2015 23:40 IST2015-09-02T22:35:38+5:302015-09-02T23:40:07+5:30
जयंत पाटील : कानडवाडीमध्ये विकासकामांचा प्रारंभ, महामंडळाकडून पाणी देण्याचा प्रयत्न

दुष्काळासाठी तिजोरी उघडण्याची गरज
कुपवाड : राज्यावर सध्या दुष्काळाचे भयंकर सावट आहे. राज्यातील दुष्काळग्रस्तांसाठी सरकारने तिजोरी उघडी करणे गरजेचे आहे. मात्र, सरकार मोजूनमापून आवश्यक असेल तेथेच निधी खर्च करीत आहे. दुष्काळग्रस्तांसाठीच्या उपाययोजनाही हे शासन करताना दिसून येत नाही. त्यांना मदत करण्याची इच्छा शासनाकडे दिसून येत नसून, दुर्लक्ष करण्याचे धोरण अवलंबले जात आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री जयंत पाटील यांनी मंगळवारी केले. कानडवाडी (ता. मिरज) येथील विविध विकास कामांच्या प्रारंभप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास मोहनराव शिंदे साखर कारखान्याचे अध्यक्ष मनोज शिंदे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष लिंबाजी पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराज पाटील, कानडवाडीचे नेते अनिल शेगुणसे प्रमुख उपस्थित होते.
जयंत पाटील म्हणाले की, सध्या केंद्र शासनाची मानसिकता ही काळजीची बाब निर्माण झाली आहे. शेतीमालाला योग्य भाव मिळावा, असे सरकारला वाटत नाही. दर पडल्याशिवाय महागाई कमी होत नाही, अशी धारणा या सरकारची आहे. कांद्याचा दर कमी होता, त्यावेळी शेतकऱ्यांनी मागणी करूनही विरोधी धोरण अवलंबले. त्यामुळे शेतकऱ्यांनी कांद्याकडे पाठ फिरविली. कांद्याच्या किमती वाढल्यावर केंद्र शासनाने परदेशातून कांदा आयात केला. त्यामुळे कांद्याच्या किमती पडल्या. साखरेबाबतीतही केंद्र शासनाची हीच भूमिका आहे. त्यामुळे सरकार हे देशातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यापेक्षा परदेशातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी धडपडत आहे. यावेळी लिंबाजी पाटील, मनोज शिंदे, राजू माळी यांची भाषणे झाली. कानडवाडी गावातील विकास कामांसाठी सहकार्य करण्याची मागणी अनिल शेगुणसे यांनी केली. भालचंद्र खोत-गुरूजी यांनी स्वागत केले. जिल्हा परिषद सदस्य आप्पासाहेब हुळ्ळे, नगरसेवक विष्णू माने, संजय बजाज, उद्योजक भालचंद्र पाटील, राहुल पवार, शेडजी मोहिते, नानासाहेब लवटे, प्रकाश व्हनकडे, दिलीप तांबडे, सोसायटीचे अध्यक्ष शिवगोंडा कोथळे, सरपंच रुक्साना मुजावर, उपसरपंच शीतल भोरे, अनुपकुमार खोत, सुदर्शन हेरले आदी उपस्थित होते. (वार्ताहर)
कानडवाडीकरांना दिलासा
कानडवाडीसह सात गावांची पाणीपुरवठा योजना बंद करण्याच्या हालचाली सुरू आहेत. तसे पत्रही कानडवाडी गावाला आले आहे.
त्या पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांनी कानडवाडी गावाला महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाकडून पाणी देण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
या घोषणेमुळे कानडवाडीकरांना दिलासा मिळाला असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. यावेळी घोषणाबाजी करण्यात आली.
कांद्याच्या किमती वाढल्यावर केंद्र शासनाने परदेशातून कांदा आयात केला. त्यामुळे कांद्याच्या किमती पडल्या. साखरेबाबतीतही केंद्र शासनाची हीच भूमिका असल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केला.