यदु जोशी।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : आपापल्या भागात प्रभाव असलेल्या नेत्यांचा (सरदारांचा) एकत्रित पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस अशी या पक्षाची व्याख्या केली जाते, मग आता या सरदारांनाच आपल्याकडे ओढले तर आपोआपच या पक्षाला घरघर लागेल अशी रणनीती भाजप व शिवसेनेने आखली असून त्यानुसार एकेका सरदारांना आपल्याकडे ओढण्याची स्पर्धा दोघांमध्ये सुरू आहे.
२०१४ च्या विधानसभा निवडणूक निकालानंतर राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आमचे कमीत कमी ५० आमदार नक्कीच निवडून येतील, असे छातीठोकपणे सांगत होते. ३५ नेते असे आहेत की जे त्या-त्या भागात अत्यंत प्रभावी आहेत आणि ते पराभूत होण्याचा प्रश्नच नाही, उर्वरित १५ जागा जिंकणे आमच्यासाठी कठीण नाही, असा तर्क त्यावेळी राष्ट्रवादीचे नेते मांडत होते. ५० तर नाही पण राष्ट्रवादीने ४२ जागा जिंकल्या आणि जयंत पाटीलांपासून मनोहर नाईकांपर्यंत असे पक्षाचे सरदारच बहुतेक जिंकले होते. प्रभावी नेत्यांची मजबूत फळी हे राष्ट्रवादीचे गंडस्थळ, त्या गंडस्थळावरच हल्ला करण्याची खेळी भाजप-शिवसेनेकडून खेळली जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी असे सरदार आपल्या गळाला लावणे आधीच सुरू केले आहे.
शरद पवार यांनी त्यांच्या राजकीय खेळीचा भाग म्हणून राज्याच्या विविध भागामध्ये राजकीय घराणी उभी केली आणि त्यांना ताकद देण्याचे काम केले. विखेंसारख्या काही घराण्यांना कायम सुरूंग लावण्याचेही अनेकदा प्रयत्न केले.भुजबळ सेनेच्या वाटेवरशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना दणका देत त्यावेळचे दिग्गज नेते छगन भुजबळ यांना पवारांनी काँग्रेसमध्ये आणून राज्यात वादळ निर्माण केले. तेच भुजबळ आज शिवसेनेच्या वाटेवर असल्याचे म्हटले जाते.
राजे तुम्ही सुद्धा!साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले हे भाजपच्या वाटेवर असल्याचे बोलले जाते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांचे निकटचे संबंध आहेत. पुसदच्या नाईक घराण्यातील निलय नाईक हे पूर्वीच भाजपमध्ये गेले आणि आता विधान परिषदेचे सदस्य आहेत. येत्या काही दिवसात राष्ट्रवादीचे आणखी काही नेते भाजप वा शिवसेनेत जाताना दिसतील.