निसर्गनिर्मित रांजण-खळगे
By Admin | Updated: July 2, 2016 03:58 IST2016-07-02T03:58:02+5:302016-07-02T03:58:02+5:30
पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्याच्या शेवटी टाकळीहाजी नावाचे गाव आणि नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्याचे निघोज गाव.

निसर्गनिर्मित रांजण-खळगे
पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्याच्या शेवटी टाकळीहाजी नावाचे गाव आणि नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्याचे निघोज गाव.
या दोघांच्या सीमेवरून कुकडी नावाची नदी वाहत गेलेली आहे. या कुकडी नदीच्या दोनही काठांवर बेसॉल्ट खडक आहे. या खडकातच निसर्गाचा अद्भुत आविष्कार आपली वाट पाहत उभा आहे.
पृथ्वीतलावर सर्वात श्रेष्ठ शिल्पकार कोण असेल तर तो आहे निसर्ग. कारण या निसर्गाने आपल्या भोवताली इतक्या सुंदर कलाकृती निर्माण केल्या आहेत की, पाहणाऱ्याचे डोळेच दीपून जावेत. निसर्गाकडून तयार झालेल्या साऱ्याच कलाकृती या अवाढव्य आणि डोळे विस्फारणाऱ्या आहेत. आपण सह्याद्रीच्या डोंगररांगांकडे गेलो की, या जास्त ठळकपणे समोर येतात. मग आपलीही बोटे आश्चर्याने तोंडात जातात. मानवाच्या शक्यतेपलीकडच्या या कलाकृती निसर्गाने तयार केलेल्या आहेत. त्या विशेष आयुधांनी. एखाद्या मानवी शिल्पकाराकडे जसे छन्नी, हातोडा अशी साधनसामुग्री असते, तसेच निसर्गाकडे पाणी, हवा, अग्नी अशी पंचमहाभूतांनी भरलेली वेगळी पण वैशिष्ट्यपूर्ण आयुधे आहेत. या आगळ्यावेगळ्या शस्त्रांनी निसर्गाने साऱ्या जगाला हेवा वाटावा अशा कलाकृती निर्माण केल्या आहेत. उदाहरणच द्यायचे झाले तर अहमदनगरमधील धडकी भरवणारी सुप्रसिद्ध सांधण व्हॅली, पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात असणारी ‘तैल-बैल’ या जोड डोंगराच्या भिंती, याशिवाय डोंगर-पर्वतांमध्ये तयार झालेल्या सुंदर घळी, कपारी, बुलडाण्यातील लोणार सरोवरसारख्या कैक कलाकृती निसर्गाचे अद्भूत लेणे म्हणून जगप्रसिद्ध आहेत.
पुणे आणि नगर जिल्ह्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या कुकडी नदीतील निसर्गनिर्मित रांजणखळगे (पॉट होल्स) इतक्या संख्येने आपल्याला इतर कुठेही पाहायला मिळणार नाहीत.
कुकडी नदीच्या काठावर उभं राहिलं की रांजणखळगे आपल्याला खुणवायला लागतात. डोळे थकून जातील पण मन भरणार नाही, इतके रांजणखळगे येथे निर्माण झाले आहेत. वेगवेगळ्या आकारांचे, उंचीचे, खोलीचे, कमी जास्त जोडीचे, एकमेकांत मिसळलेले हे रांजणखळगे जणूकाही भूतलावरचं अनोखं शिल्पसमूहच. तसं पाहिलं तर या निर्मितीमागेही एक विज्ञान दडलेलं आहे, असे म्हणतात. नदीने वाहून आणलेले दगड हे या बेसॉल्ट खडकावरील छोट्या भेगांत अडकले जातात. पाण्याच्या जोरदार प्रवाहाने हे दगड याच भेगांत जोराने फिरून गोलाकार खड्ड्यांमध्ये रूपांतर होत असतात. या प्रक्रियेला काही थोडकी वर्ष नव्हे तर हजारो वर्ष जावी लागतात. हजार वर्षांनंतर या छोट्या भेगा रांजणासारख्या खड्ड्यांचेच रूप घेऊन निर्माण होतात.
कुकडी नदीच्या दोन्ही तीरांवर मळगंगा देवीची मंदिरं बांधली आहेत. ही मंदिरेसुद्धा तितकीच देखणी आहेत. त्यामुळे या ठिकाणी स्थानिक भक्तांचादेखील वावर असतो. सध्या येथे दोन्ही तीरांना जोडणारा झुलता पूलदेखील बांधण्यात आला आहे. त्यामुळे हा पूलदेखील पर्यटकांसाठी विशेष आकर्षण बनला आहे. या पुलावरून रांजणखळगे पाहणे म्हणजे भटकंतीचा उत्कर्षबिंदूच.
कुकडी नदीतील या रांजणखळग्याचं महत्त्व ओळखून अनेक पर्यावरणप्रेमींची, विज्ञान अभ्यासकांची पावले इकळे वळत असतात. आपणही भटकंतीला विज्ञानाच्या किमयेची जोड देऊन येथे वाट वाकडी करायला हरकत नाही. कारण नेहमीचीच, सरावाची भटकंतीची ठिकाणे पाहण्यापेक्षा अशी निसर्गाने तयार केलेली व उच्चनिर्मितीमूल्ये असलेली ठिकाणे पाहणे हे केव्हाही ज्ञानात भर घालणारीच असतात.
-- ओमकार वर्तले