राष्ट्रीय ग्राहक आयोगाचे खंडपीठ नागपुरात येणार
By Admin | Updated: September 2, 2014 01:06 IST2014-09-02T01:06:31+5:302014-09-02T01:06:31+5:30
दिल्लीतील राष्ट्रीय ग्राहक वाद निवारण आयोगाच्या परिक्रमा खंडपीठाची विशेष बैठक नागपुरात १५ ते २६ सप्टेंबरदरम्यान रविभवन येथे आयोजित करण्यात आली असून, यादरम्यान १४४ प्रकरणांवर सुनावणी होणार आहे.

राष्ट्रीय ग्राहक आयोगाचे खंडपीठ नागपुरात येणार
१२ दिवस कामकाज : १४४ प्रकरणांची सुनावणी
नागपूर : दिल्लीतील राष्ट्रीय ग्राहक वाद निवारण आयोगाच्या परिक्रमा खंडपीठाची विशेष बैठक नागपुरात १५ ते २६ सप्टेंबरदरम्यान रविभवन येथे आयोजित करण्यात आली असून, यादरम्यान १४४ प्रकरणांवर सुनावणी होणार आहे.
सुनावणी यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्राहक वाद निवारण आयोगाचे प्रमुख न्या. रवींद्र चव्हाण व नागपूर परिक्रमा खंडपीठाचे प्रमुख बी.ए. शेख यांच्या नेतृत्वाखाली नागपूर परिक्रमा खंडपीठाने तयारीला सुरुवात केली आहे.
ग्राहकांची फसवणूक होऊ नये म्हणून केंद्र सरकारने ग्राहक कायद्यान्वये प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा ग्राहक मंच व राज्य पातळीवर राज्य ग्राहक वाद निवारण आयोगाची स्थापना केली.
राज्य आयोगाचे महाराष्ट्रात मुंबईत तीन, औरंगाबाद व नागपूर येथे प्रत्येकी दोन परिक्रमा खंडपीठ कार्यरत आहेत. राष्ट्रीय ग्राहक वाद निवारणाकडे दाद मागणाऱ्या ग्राहकांना दिल्लीत जाणे अवघड ठरते.
ही अडचण दूर करण्यासाठी आयोगानेच प्रत्येक वर्षी विविध राज्यातील प्रमुख शहरात सुनावणी घेण्याचा निर्णय घेतला.
त्यानुसार नागपुरात ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. यापूर्वी पुणे येथे बैठक झाली होती. (प्रतिनिधी)