ईटीसी केंद्राला राष्ट्रीय पुरस्कार
By Admin | Updated: August 25, 2016 02:37 IST2016-08-25T02:37:42+5:302016-08-25T02:37:42+5:30
महानगरपालिकेचे ई.टी.सी. अपंग शिक्षण प्रशिक्षण व सेवासुविधा केंद्र हे अपंग व्यक्तींना स्वावलंबी बनविण्याचे कार्य करते

ईटीसी केंद्राला राष्ट्रीय पुरस्कार
नवी मुंबई : महानगरपालिकेचे ई.टी.सी. अपंग शिक्षण प्रशिक्षण व सेवासुविधा केंद्र हे अपंग व्यक्तींना स्वावलंबी बनविण्याचे कार्य करते. भारतीय गुणवत्ता परिषद अर्थात क्वालिटी कौन्सिल आॅफ इंडिया या गुणवत्तेचे मानांकन ठरविणाऱ्या नामांकित संस्थेमार्फत डी.एल.शाह सुवर्ण पुरस्कार २०१६ या राष्ट्रीय पुरस्काराने दिल्ली येथील विशेष समारंभात ईटीसी केंद्राला गौरविण्यात आले आहे.
केंद्रीय मंत्री कलराज मिश्रा यांच्या सन्माननीय उपस्थितीत या पुरस्कार सोहळ््याचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय गुणवत्ता परिषदेचे अध्यक्ष आदिल झैनुलभाई व डी.एल. शहा ट्रस्टचे अध्यक्ष हरी तनेजा यांच्या शुभहस्ते ईटीसी केंद्र संचालिका डॉ. वर्षा भगत यांनी स्वीकारला. क्वालिटी कौन्सिल आॅफ इंडियामार्फत दिला जाणारा डी.एल.शाह पुरस्कार शासकीय संस्था, खाजगी संस्था, निमशासकीय संस्था, शिक्षण क्षेत्र, आर्थिक क्षेत्र अशा पंधरा विविध क्षेत्रातील वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या तसेच बहुकौशल्य कार्यप्रणाली राबवित माहिती तंत्रज्ञानाचा अंतर्भाव करणाऱ्या संस्थांना प्रदान करण्यात येतो. महानगरपालिकेच्या ई.टी.सी. केंद्राला भारतीय गुणवत्ता परिषदेच्या ११ व्या राष्ट्रीय बैठकीत पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी आपल्या कार्याचे माहितीप्रद सादरीकरण करण्याचा बहुमान देण्यात आला. यावेळी केंद्र संचालिका डॉ.वर्षा भगत यांची अपंग व्यक्ती व मुले यांच्याकरिता कार्य करणाऱ्या या ई.टी.सी. केंद्राबद्दल सादरीकरणाव्दारे माहिती दिली.