काँग्रेसच्या योजनेला नरेंद्र मोदींचा मुलामा!
By Admin | Updated: August 19, 2014 00:52 IST2014-08-19T00:52:01+5:302014-08-19T00:52:01+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून भाषण करीत होते आणि किती ही दूरदृष्टी असे म्हणत सगळ्यांनी टाळ्या वाजवत त्यांचे कौतुक केले.

काँग्रेसच्या योजनेला नरेंद्र मोदींचा मुलामा!
अतुल कुलकर्णी - मुंबई
प्रत्येक खासदाराने एक तरी गाव दत्तक घेतले पाहिजे.. गावे स्वच्छ झाली पाहिजेत.. पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून भाषण करीत होते आणि किती ही दूरदृष्टी असे म्हणत सगळ्यांनी टाळ्या वाजवत त्यांचे कौतुक केले. जणूकाही नवाकोरा विचार मोदींनी मांडलाय असेच सगळ्यांना वाटू लागले खरे; मात्र ना ही योजना नवी कोरी आहे ना हा विचार पहिल्यांदा मांडला जातोय.
कायम सतत नवनवीन योजना राबविण्यात अग्रेसर असणा:या पुरोगामी महाराष्ट्रात ही योजना या आधीच कित्येक वर्षे सुरू आहे. विद्यमान गृहमंत्री आर. आर. पाटील ग्रामविकासमंत्री असताना त्यांनी ग्रामस्वच्छता अभियान राबवले. त्यावेळी मुख्यमंत्री होते विलासराव देशमुख. दोघांनी या योजनेला भरीव पाठबळ दिल्याने राज्यातील अनेक गावे लखलखीत स्वच्छ झाली. त्या गावांना ‘आदर्श गाव’ पुरस्कार मिळाले. राज्यातील ग्रामीण भागात ही योजना आजही अव्यहातपणो चालू आहे. त्यानंतर राजकीय बदल झाले. विलासराव देशमुख केंद्रात ग्रामविकासमंत्री म्हणून गेले. तेव्हा त्यांनी आपल्या राज्यातली ही योजना देशपातळीवर राबविण्याची घोषणा केली. त्यावेळी राज्याची आणखी एक योजना देश पातळीवर गेली, अशा बातम्याही प्रकाशित झाल्या. त्याच्या काही बैठका देखील तेव्हा विलासरावांनी घेतल्या होत्या.
त्याही आधी पंचायतराज संस्थेची संकल्पना महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी मांडली होती, तर पंचायतराज योजनेच्या माध्यमातून खेडी स्वतंत्र करण्याची संकल्पना तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी मांडली होती. आजही राज्यातील उत्कृष्ट जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त विद्यमाने 25 लाखांपासूनची बक्षिसे दिली जात आहेत. तर ग्रामस्वच्छता अभियानात देखील गावांना लाखो रुपयांची बक्षिसे दिली जातात.
मात्र मध्यल्या काळात राजकीय बदल झाले. सरकार बदलले. मोदी पतंप्रधान झाले आणि लाल किल्ल्यावरून भाषण करताना प्रत्येक खासदाराने एक तरी गाव स्वच्छ केले पाहिजे, अशी घोषणा केली. त्यामुळे काही तरी नवीनच क्रांतिकारी योजना आणली गेल्याच्या चर्चा सुरू झाल्या असल्या, तरी यात नवीन काहीच नाही.