नारायण राणे पुन्हा आक्रमक
By Admin | Updated: July 21, 2014 02:52 IST2014-07-21T02:52:11+5:302014-07-21T02:52:11+5:30
लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर काही बदल होणे अपेक्षित होते; मात्र ते झाले नाहीत. हेच नेतृत्व कायम राहिले

नारायण राणे पुन्हा आक्रमक
कणकवली : लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर काही बदल होणे अपेक्षित होते; मात्र ते झाले नाहीत. हेच नेतृत्व कायम राहिले तर विधानसभा निवडणुकीतही काँग्रेसचा असाच पराभव होईल. त्यामुळेच आपली नाराजी प्रकट करण्यासाठी आपण मंत्रिपदाचा राजीनामा देणार असल्याचे उद्योगमंत्री नारायण राणे यांनी सांगितले. आता इथून पुढे मात्र नेहमीच्या आक्रमक स्वभावानुसार वागणार आहोत, असे सांगत, विरोधक बेताल झाल्याने आता प्रत्येकाला जशास तसे उत्तर देणार, असा इशाराही त्यांनी दिला.
राणे सोमवारी मंत्रिपदाचा राजीनामा देणार आहेत. तत्पूर्वी कोकणातील लोकांशी संवाद साधण्यासाठी त्यांनी कोकणचा दौरा केला. या दौऱ्याचा समारोप रविवारी कार्यकर्त्यांच्या स्नेह मेळाव्याने कणकवलीत झाला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी अनेक मुद्द्यांबाबत स्पष्टपणे उत्तरे दिली.
महाराष्ट्रातील नेतृत्वाबाबत आपण नाराजी व्यक्त केली असली तरी मुख्यमंत्र्यांशी आपले वैर नाही. ते आपले मित्र आहेत; पण प्रश्न पक्षाचा आहे. याच नेतृत्वाखाली काँग्रेस विधानसभा निवडणुकांना सामोरी गेली तर लोकसभेसारखाच दारुण पराभव होईल. या पराभवाची जबाबदारी आपल्यावर येऊ नये, यासाठीच आपण राजीनामा देत आहोत, असे ते म्हणााले.
पक्षाच्या हायकमांडने तुमचा विश्वासघात केला का? या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, आपण विश्वासघात असा शब्द कधीच वापरलेला नाही. २००५ मध्ये आपण काँग्रेसमध्ये प्रवेश केला, त्या वेळी आपल्याला सहा महिन्यांत मुख्यमंत्री बनविण्याचा शब्द देण्यात आला होता. हा शब्द पाळण्यात आलेला नाही, एवढेच आपले म्हणणे आहे.
आपला आक्रमक स्वभाव आणि काँग्रेस कल्चर यात फरक आहे. गेली नऊ वर्षे आपण आपल्या स्वभावाला बगल देत काँग्रेस कल्चर स्वीकारलेच आहे. गेली दोन वर्षे आपण कोणाच्याही टीकेला प्रत्युत्तर दिलेले नाही; मात्र आता विरोधक बेताल झाले आहेत. त्यांची तोंडे सुटली आहेत. त्यामुळेच आपण उत्तर द्यायला सुरुवात केली आहे. यापुढे प्रत्येकाला जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. या वेळी राणे यांच्यासमवेत संदेश पारकर,
विकास सावंत उपस्थित होते. (प्रतिनिधी)