जीवनदायी योजनेचे नाव बदलणार नाही
By Admin | Updated: October 20, 2015 00:10 IST2015-10-20T00:10:52+5:302015-10-20T00:10:52+5:30
राजीव गांधी जीवनदायी योजनेचे नाव बदलून त्याला दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी शिवसेना मंत्र्यांकडून होत असली तरी तसा कुठलाही प्रस्ताव
जीवनदायी योजनेचे नाव बदलणार नाही
मुंबई : राजीव गांधी जीवनदायी योजनेचे नाव बदलून त्याला दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी शिवसेना मंत्र्यांकडून होत असली तरी तसा कुठलाही प्रस्ताव अद्याप आलेला नाही, असे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी सोमवारी स्पष्ट केले. तसेच जुन्या योजनेचे नाव बदलण्यापेक्षा ठाकरे यांच्या नावाने एखादी नवी योजना सुरू करा, असा सल्लाही त्यांनी दिला.
राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी राजीव गांधी जीवनदायी योजनेत काही फेरबदल करून त्या योजनेला दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा प्रस्ताव असल्याचे सूतोवाच केले होते. याबाबत खडसे म्हणाले की, जुन्या योजनांची नावे बदलण्याची प्रथा नाही. राज्यात १९९५ ते १९९९ या कालावधीत शिवसेना-भाजपा युतीचे सरकार होते तेव्हाही जुन्या योजनांची नावे बदलली नव्हती. नव्या योजनांना नवे सरकार नावे देते, असेही ते म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)