पंढरीत आजपासून ‘नामाचा जयघोष’
By Admin | Updated: October 31, 2015 02:14 IST2015-10-31T02:14:29+5:302015-10-31T02:14:29+5:30
‘नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी’ असे म्हणत ज्यांनी भागवत धर्माचा प्रचार आणि प्रसार महाराष्ट्रापासून पंजाबपर्यंत केला असे संत नामदेव महाराज यांच्या नावाचे

पंढरीत आजपासून ‘नामाचा जयघोष’
पंढरपूर : ‘नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी’ असे म्हणत ज्यांनी भागवत धर्माचा प्रचार आणि प्रसार महाराष्ट्रापासून पंजाबपर्यंत केला असे संत नामदेव महाराज यांच्या नावाचे साहित्य संमेलन शनिवारपासून सुरू होत आहे. त्यासाठी पंढरपूरकर सज्ज झाले असून, उद्यापासून तीन दिवस पंढरपूरच्या घराघरात ‘नामाचा गजर’ होणार आहे.
पंढरपुरातील ऐतिहासिक तनपुरे महाराज मठामध्ये हे संमेलन होणार असून त्यामध्ये राज्यभरासह पंजाबहून सुमारे पाच हजार लोक येण्याची अपेक्षा आहे. त्यांच्या निवासासाठी तनपुरे महाराज मठ, गजानन महाराज मठ, मंदिर समितीचे वेदांत भवन, नामदेव मंदिर येथे राहण्याची व भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.
तनपुरे महाराज मठाच्या प्रांगणातच तब्बल दीड हजार लोक बसू शकतील अशी आसनव्यवस्था करण्यात आली असून, त्यासाठी ६० फूट बाय १५० फुटाचा भव्य मांडव उभा करण्यात आला आहे. २० बाय ३० फुटाचा मंच तयार करण्यात आला आहे. तर भोजनासाठी स्वतंत्र कक्ष उभा करण्यात आला असून त्यासाठी ३० बाय १०० फुटांचा मांडव आणि एकाचवेळी सातशे जण भोजन करु शकतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. तनपुरे महाराजांच्या प्रांगणातच नामदेवांसह इतर संतांचे साहित्य आणि आध्यात्मिक पुस्तकांचे स्टॉल्स उभाण्यात आले आहेत.