नागपूर विमानतळ तोट्यात

By Admin | Updated: August 20, 2014 01:08 IST2014-08-20T01:08:49+5:302014-08-20T01:08:49+5:30

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ गेल्या १० वर्षांपासून तोट्यात आहे. वार्षिक तीन ते पाच कोटींचा तोटा आहे. मिहानप्रमाणे विमानतळाला नवसंजीवनी देण्यास राज्य सरकार अपयशी ठरले आहे.

Nagpur airport loss | नागपूर विमानतळ तोट्यात

नागपूर विमानतळ तोट्यात

राज्य सरकार अपयशी : वार्षिक तीन ते पाच कोटींचा तोटा
वसीम कुरेशी - नागपूर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ गेल्या १० वर्षांपासून तोट्यात आहे. वार्षिक तीन ते पाच कोटींचा तोटा आहे. मिहानप्रमाणे विमानतळाला नवसंजीवनी देण्यास राज्य सरकार अपयशी ठरले आहे.
महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी (एमएडीसी) आणि भारतीय विमानतळ प्राधिकरणाची (एएआय) संयुक्त कंपनी मिहान इंडिया लिमिटेड (एमआयएल) विमानतळाचे संचालन करते. पुढे संचालनासाठी या कंपनीला अद्याप कुणी भागीदार मिळाला नाही, हे विशेष.
२०१०-११ मध्ये एमआयएलला जवळपास ३० कोटींचे उत्पन्न झाले. २०१२-१३ मध्ये जवळपास ३४ कोटी आणि २०१३-१४ मध्ये ३५ कोटींचे उत्पन्न मिळाले. उपरोक्त वर्षांमध्ये कंपनीला वार्षिक तीन ते पाच कोटींचा तोटा झाला आहे.
एटीसी उत्पन्नात कमकुवत
४९ टक्के भागीदारी असलेल्या एएआयला नागपुरातून उड्डाण भरणाऱ्या प्रत्येक विमानावर दरदिवशी ३० हजार रुपये हवाई वाहतूक मार्गाद्वारे मिळतात. शेड्यूलव्यतिरिक्त नॉनशेड्यूल विमानांद्वारे एएआयला यावर्षी एकूण ७.२ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले.
भारतीय विमानतळ प्राधिकरणाने दोन वर्षांत नेव्हिगेशन व एअर ट्रॅफिक कन्ट्रोल सर्व्हिसेसला सर्वोत्तम बनविले आहे.
हवाई मार्ग विश्वसनीय झाल्याचा फायदा मुंबई व दिल्ली विमानतळाला मिळाला आहे. या दोन्ही शहरांमध्ये विदेशी आणि देशाच्या अन्न शहरांतील विमानाची मोठ्या प्रमाणात ये-जा असते.
बहुतांश उड्डाणे टर्मिनेटिंग पॉर्इंट असल्याने या शहरांना नागपूर एटीसीच्या टप्प्यातील मार्गाच्या उपयोगाने जास्त उत्पन्न मिळते. हे उत्पन्न अखेर एएआयच्या खात्यात जाते. (प्रतिनिधी)
वाय-फाय कनेक्टिव्हिटीचा अभाव
आंतरराष्ट्रीय विमानतळाचा दर्जा असतानाही हे विमानतळ अनेक बाबतीत मागे आहे. इंटरनेटसाठी वाय-फाय सुविधा नाही. काही दिवसांआधी एका खासगी कंपनीने नि:शुल्क सेवा देण्याची आॅफर दिली होती. यंत्रणाही बसविली, नंतर कंपनीने काढता पाय घेतला. प्रवाशांना काहीच दिवस कनेक्टिव्हिटी मिळाली. यासाठी जाहिरात करून कंपनीने आपला प्रचार केला. उत्पन्नाचा स्रोत एमआयएलला तोट्याचा ठरला.
स्कायलॉर्कवर १० कोटी थकीत
बैतूल (मध्य प्रदेश) येथील रहिवासी अनिवासी भारतीय सेम वर्मा यांचे ‘स्कायलॉर्क’ हे विमान २४ वर्षांपासून विमानतळावर तळ ठोकून आहे. सध्या ते अत्यंत खराब झाले आहे. आधी एएआय आणि हस्तांतरणानंतर एमआयएलला एकूण १० कोटी वसूल करायचे आहे. या रकमेत व्याज जोडले आहे. पूर्वी एएआयने या विमानाचे रूपांतर रेस्टॉरंटमध्ये करून उत्पन्नाचा विचार केला होता. मनपाने एरो पार्क प्रकल्पासाठी स्वावलंबीनगर येथे स्थापन करण्याचा प्रयत्न केला होता. दोन्ही प्रस्ताव थंडबस्त्यात गेले. या विमानाचे प्रकरण सध्या न्यायालयात प्रलंबित आहे. धावपट्टीपासून सुमारे ९० मीटरवर हे विमान उभे आहे. सुरक्षेच्या दृष्टीने धावपट्टीपासून १५० मीटरपर्यंत कोणतीही वस्तू असे नये, असा नियम आहे.

Web Title: Nagpur airport loss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.