मुंबई-गोवा महामार्ग गजबजला
By Admin | Updated: September 5, 2016 02:04 IST2016-09-05T02:04:23+5:302016-09-05T02:04:23+5:30
मोठ्या प्रमाणात पडणारे खड्डे याला कंटाळून गेली अनेक वर्षे गणपतीसाठी कोकणात जाणारे चाकरमानी मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्गावरून न जाता अन्य मार्गाने जात होते

मुंबई-गोवा महामार्ग गजबजला
दासगाव : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर पनवेल ते इंदापूर चौपदरीकरणाचे काम, त्याचप्रमाणे दरवर्षी पावसाळ्यात या मार्गावर मोठ्या प्रमाणात पडणारे खड्डे याला कंटाळून गेली अनेक वर्षे गणपतीसाठी कोकणात जाणारे चाकरमानी मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्गावरून न जाता अन्य मार्गाने जात होते. तसेच यंदा महाड सावित्री पूल दुर्घटना ही नजरेसमोर होती. परंतु महामार्गावरील खड्डे बुजविल्याने महामार्ग चांगल्या स्थितीत असून, गेल्या दोन दिवसांपासून या मार्गाने जाणाऱ्या वाहनांची संख्या वाढली आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात मुंबई-गोवा महामार्ग गजबजला आहे.
संपूर्ण कोकणात सोमवारी गणरायाचे आगमन होणार आहे. अनेक वर्षांपासून मुंबई, सुरत, गुजरात अन्य ठिकाणांहून कोकणात जाणारी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरची वाहतूक कमी झाली होती. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेले पनवेल ते इंदापूर महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम व दरवर्षी पावसाळ्यात या मार्गावर पडणारे मोठमोठे खड्डे, यामुळे होणारी वाहतूककोंडी या सर्व बाबींना कोकणातील चाकरमानी कंटाळून पुणे द्रुतगती महामार्गावरून ६० ते ७० किमी जास्त अंतर घेत दरवर्षी कोकणात जात होते.
तर या मार्गावरील खासकरून पनवेल विभाग पोलिसांमार्फत याच मार्गी वाहनांना वळवण्यात येत असे. रस्ता जरी चांगला असला तरी लांब पल्लामुळे चाकरमान्यांना मानसिक त्रास सहन करावा लागत असे. यंदा शासनाने या मार्गावर गणेशोत्सवापूर्वी खड्डे भरण्याच्या कामावर जातीने लक्ष दिल्याने पनवेल ते कोकणात जाणारे सर्वच मार्ग चकाचक झाले. दरवर्षी मुरमाने खड्डे भरले जात असत. यंदा डांबर टाकून भरण्यात आले आहेत. यामुळे चाकरमान्यांनी या मार्गाला यंदा पसंती दिली. (वार्ताहर)
>खड्डे भरल्यामुळे कोंडीचा प्रश्न सुटला
मुंबईवरून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरून जाण्यासाठी तीन मार्ग अवलंबले. मुंबई-पामबीच-खारपाडा; दुसरा मुंबई-पनवेल-वडखळ सरळ कोकण तर मुंबई-कळंबोली-पुणे द्रुतगती मार्गे पाली-वाकण-नागोठणे-कोकण असे तीन मार्ग अवलंबल्याने वाहतूक तीन मार्गी विभागली. यामुळे दरवर्षी वडखळ नाका येथे होणाऱ्या मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडीचा प्रश्न सुटला; तर खड्ड्यांमुळे होणारी वाहतूककोंडीही यामुळे बंद झाली. फक्त कोलाड व माणगाव या दोन ठिकाणी काही प्रमाणात वाहतूककोंडी पाहावयास मिळाली.
>सावित्री दुर्घटनेचा काही परिणाम नाही
२ आॅगस्ट रोजी महाडमध्ये सावित्री पूल कोसळून ४१ प्रवाशांचे प्राण गेले होते. यंदा या दुर्घटनेचा परिणाम गणपती सणासाठी कोकणात जाणाऱ्या वाहतुकीवर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र यंदा याच्या उलट परिस्थिती पाहावयास मिळाली. एवढी मोठी घटना घडली असतानादेखील याच मार्गाला व बाजूच्या पुलावरून कोणत्याही तऱ्हेची भीती न बाळगता कोकणातील चाकरमान्यांनी पसंती दिली.