मुंबई-अहमदाबाद हाय वे जॅम
By Admin | Updated: August 1, 2016 02:57 IST2016-08-01T02:57:26+5:302016-08-01T02:57:26+5:30
मुंबई-अहमदाबाद हायवेवर चिंंचोटी नजिक काठीयावाडी ढाबा परिसरात पाणी तुंबून राहिल्याने मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली

मुंबई-अहमदाबाद हाय वे जॅम
वसई : मुंबई-अहमदाबाद हायवेवर चिंंचोटी नजिक काठीयावाडी ढाबा परिसरात पाणी तुंबून राहिल्याने मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. शनिवारपासून हा प्रकार सुरु झाल्याने वाहतूक कोंडी होऊ लागली आहे.
गेल दोन दिवसांपासून वसईत मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्याचा फटका हायवेला बसू लागला आहे. पहिल्यांदाच हायवेवर मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर शनिवारपासून पाणी जमा झाल्याने ही कोंडी झाली. त्यामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक चिंंचोटी-कामण- भिवंडी ठाणे-मुंबई अशी वळवण्यात आली. तर गुजरातकडे जाणारी वाहतूक मुंबई-फाऊंटन हॉटेल उजवे वळण-घोडबंदर रोड-ठाणे-भिवंडी-कामण-चिंंचोटी या मार्गावरून वळवण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
सतत पडत असलेल्या पावसामुळे थंडी वाढल्याने मनोर परिसरात ताप, खोकला, सर्दीची साथ पसरल्याने दवाखाने हाऊसफुल्ल झाले असन त्यात लहान मुलांचे प्रमाण प्रचंड आहे.
मनोर, टेण, नांदगाव, पोळे, हलोली, दहिसर, सावरे, येम्बूर, दुर्वेस, पोचडे अशा अनेक गावांत ही साथ पसरली आहे. परिसरातील आश्रम शाळेतील मुलानांही तिची बाधा झाली असून त्यांनाही उपचारासाठी मनोरच्या ग्रामीण रु ग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
>वसईला पावसाने झोडपले, जनजीवन विस्कळीत
वसईत पावसाने जोरदार हजेरी लावल्याचा जोरदार फटका स्थानिकांना बसला.
शिरसाड येथे लोखंडाने भरलेला ट्रक पलटी झाल्याने माहामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली.
तसेच अंबाडी शिरसाड मार्गावरील उसगाव येथे जोरदार पावसामुळे झाड पडल्याने या ठिकाणी वाहनांच्या रांगा पाच किमी पर्यंत लागल्या होत्या.
तसेच भाताणे, मेढे पूल पाण्याखाली गेल्याने १५ गावांचा संपर्क तुटला.
>आता थांबण्यासाठी साकडे
सतत तीन दिवसापासून बरसत असलेल्या वरुणराजामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून नद्या, नाले रस्ते पाण्याने भरून गेले आहेत.
शेतकऱ्यांनी केलेल्या आवण्याही सततच्या पावसामुळे निष्फळ ठरून शेतीचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी आता वरुणराजाला विश्रांती घे रे बाबा, अशी विनवणी करीत आहेत.