मोदी-जेटलींनी जनतेला फसवले
By Admin | Updated: February 15, 2016 04:04 IST2016-02-15T04:04:24+5:302016-02-15T04:04:24+5:30
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान नरेंद्र मोदी आणि अरुण जेटली यांनी स्विस बँकेतील काळा पैसा परत आणू, असे आश्वासन दिले होते. मात्र, ते केवळ आश्वासनच ठरले

मोदी-जेटलींनी जनतेला फसवले
पुणे : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान नरेंद्र मोदी आणि अरुण जेटली यांनी स्विस बँकेतील काळा पैसा परत आणू, असे आश्वासन दिले होते. मात्र, ते केवळ आश्वासनच ठरले. त्यासाठी दोघांनी कोणतेही विशेष प्रयत्न केले नाहीत. उलट जनतेची फसवणूकच केली, असा हल्लाबोल ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ राम जेठमलानी यांनी रविवारी केला. काँग्रेस काय किंवा भाजपा काय सगळेच एकाच माळेचे मणी आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.
पंडित जवाहरलाल नेहरु सभागृह येथे टॉप मॅनेजमेंट काँझोरिअमच्या वतीने ‘इफेक्टिव्ह फंक्शनिंग आॅफ पार्लमेंट फॉर व्हायब्रंट डेमॉक्रॉसी’ या विषयावर आयोजित राष्ट्रीय परिषदेच्या समारोपात ते बोलत होते. या वेळी सिंबायोसिसचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. शां. ब मुजुमदार, माजी न्यायमूर्ती पी. बी़ सावंत व अन्य मान्यवर उपस्थित होते.
जेठमलानी म्हणाले, ‘काळ्या पैशांचा साठा करणाऱ्या व्यक्तींची यादी २०१०मध्ये स्विस बँकेकडून जर्मनीला देण्यात आली होती. मात्र, भारताने ही यादी मिळण्यासंबंधी साधे पत्रही लिहिले नाही. उलट स्वित्झर्लंडबरोबर पूर्वीचे काही मागणार नाही, अशा स्वरूपाचा ‘दुहेरी कर आकारणी टाळण्याचा’ करार करण्यात आला. तरीही विरोधी पक्षातील असल्याने ती यादी मिळावी, अशी मागणी मी जर्मन सरकारला पत्राद्वारे केली. त्यावर ‘विरोधी पक्षनेत्याचे पत्र द्या,’ असे मला सांगण्यात आले. मात्र, लालकृष्ण आडवाणी यांनी मला पत्र दिले नाही.’
‘लोकसभा निवडणुकीत भाजपाने हाच मुद्दा घेतला आणि विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री अरुण जेटली यांनी काळा पैसा परत आणण्याचे आश्वासन जनतेला दिले. या एका मुद्द्यासाठी बिहार निवडणुकीमध्ये आपण भाजपाचा प्रचार केला, परंतु मोदी आणि जेटलींनी काळा पैसा परत आणण्यासाठी कोणते प्रयत्न केले नाहीत,’ असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)