इचलकरंजी : राज्य सरकारने धर्मांतरण बंदीचा कडक कायदा तातडीने करावा. ऋतुजा राजगे हिला न्याय मिळवून द्यावा, अशी राज्य सरकारकडे मागणी करण्याबरोबरच पंढरीच्या वारीवर बोलणाऱ्याचे थोबाड पावसाळी अधिवेशनात रंगवल्याशिवाय सोडणार नाही, असा इशारा आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिला.ऋतुजा राजगे हिला न्याय मिळाला पाहिजे आणि धर्मांतरणाला विरोध करीत शिवतीर्थ येथून सोमवारी निषेध मोर्चा काढण्यात आला. सकल हिंदू समाजाच्या वतीने महिलांच्या हस्ते प्रांताधिकारी दीपक शिंदे यांना निवेदन देण्यात आले.प्रांत कार्यालयासमोर आयोजित सभेत बोलताना आमदार पडळकर म्हणाले, धर्मांतरणाचे प्रस्थ वाढले आहे. शिक्षण आणि घर बांधणीसाठी मदत देण्याचे आश्वासन देऊन गोरगरिबांना ओढले जाते आणि नंतर त्यांचे धर्मांतरण केले जाते. असे करणाऱ्या पादरींना ठोकून काढले पाहिजे. हिंदू समाजाला मिळणारा आरक्षणाचा फायदा घेऊन नोकरी करतात. मात्र, प्रत्यक्षात हिंदूऐवजी दुसऱ्या पद्धतीचे आचरण समाजात करतात.
वाचा- ‘अबू आझमी’ना वारीचे महत्त्व समजावून सांगेन : हसन मुश्रीफसर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार नोकरीसाठी घेतलेले आरक्षण ज्या पद्धतीचे असते, त्या पद्धतीनेच आचरण करणे गरजेचे आहे. वेगळ्या पद्धतीने जर कोण आचरण करत असेल, तर त्यांची यादी तयार करा आणि त्यांना सेवेतून काढून टाकण्यासंदर्भात महापालिका आणि जिल्हा परिषदेला निवेदन द्या. त्याचा पाठपुरावा मी करेन.आमदार पडळकर म्हणाले, हे राष्ट्र आमचे, वारी आमची. पांडुरंग आमचा, वारकरी आमचे आणि विनाकारण काही लोक वारीवर बोलत आहेत. त्यांना ठोकून काढण्यास आम्ही सज्ज आहोत. मालेगावचा आमदार औरंगजेबचे गुनगान गात आहे. त्याला गाडले पाहिजे. शासनाने धर्मांतरणविरोधी कायदा तातडीने करावा आणि त्याला धर्मवीर संभाजी महाराज आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव द्यावे. यावेळी आमदार राहुल आवाडे, गजानन महाजन-गुरुजी, आदी उपस्थित होते.