लाखो खर्चून उभारले सूचना फलक !
By Admin | Updated: June 30, 2016 02:59 IST2016-06-30T02:59:15+5:302016-06-30T02:59:15+5:30
रस्त्यांवरील जुन्या सूचना फलकांची उपेक्षा करून नव्या फलकांच्या उभारणीकरिता लाखो रुपये उधळले जात आहेत.

लाखो खर्चून उभारले सूचना फलक !
कांता हाबळे,
नेरळ- कर्जत तालुक्यातील महत्त्वाच्या रस्त्यांवरील जुन्या सूचना फलकांची उपेक्षा करून नव्या फलकांच्या उभारणीकरिता लाखो रुपये उधळले जात आहेत. जुने फलक दुरुस्ती करून उभारण्याऐवजी नव्या फलकासाठी केली जाणारी ही उधळण सार्वजनिक बांधकाम विभागाला कशी परवडते? हा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित के ला जात आहे. तालुक्यातील नेरळ-कळंब, नेरळ-कशेळे, कर्जत -मुरबाड, कर्जत-चौक, उकरु ळ-चांदई या महत्वाच्या रस्त्यांवर बांधकाम विभागाने लाखो रुपये खर्च करून नव्याने सूचना फलक व दिशादर्शक फलक उभारले असल्याचा दावा बांधकाम विभाग करीत आहे. परंतु जुने फलक बऱ्याच ठिकाणी आडवे तर काही फलक झाडाझुडपांच्या विळख्यात अडकलेले दिसत आहेत. त्याच जागेवर नवीन फलक उभारले आहेत. मात्र जुन्या फलकांकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केले आहे.
या महत्वाच्या रस्त्यावर काही वर्षांपूर्वी सावधान! पुढे अपघाती वळण आहे, पुढे गतिरोधक आहे, पुढे शाळा आहे, पुढे गाव आहे, वाहने सावकाश चालवा अशा प्रकारच्या सूचना असलेले फलक लावण्यात आले आहेत. परंतु असे अनेक फलक काही ठिकाणी आडवे झाल्याचे दिसत आहेत, तर काही ठिकाणी या फलकांवर काय लिहिले आहे याचा उलगडाही होत नाही. मात्र याकडे दुर्लक्ष करून नवीन फलकांवर लाखो रु पयांची उधळण केली आहे. नवीन लावण्यात आलेल्या फलकांबाबत बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली असता आज माहिती देतो, उद्या देतो अशीच उत्तरे दिली जात आहे. मग याबाबत माहिती न देण्याचं कारण काय ? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. नेरळ- कळंब रस्त्यावरील वरई, अवसरे, बिरदोले, धोमोते, दहीवली नेरळ रेल्वे फाटक तर कशेळे रस्त्यावरील वाकस पुलाजवळ, कोलीवली गावाजवळ अशा अनेक ठिकाणी लावण्यात आलेले सूचना फलक व दिशा दर्शविणारे फलक आडवे झाले आहेत. तसेच झाडा-झुडपांच्या विळख्यात सापडले आहेत. त्याकडे लक्ष देण्यास बांधकाम खात्याला वेळ मिळत नसल्याचे चित्र आहे. तसेच या रस्त्यावरील अनेक फलकांवर काय लिहिले आहे याचाही उलगडा होत नाही. अनेक फलकांना झाडा-झुडपांनी वेढले आहे. असे असताना अनेक वर्षांपासून लावण्यात आलेल्या या फलकांवर बांधकाम खात्याने दुर्लक्ष करून त्याच जागी नवीन फलक लावण्यात आले आहेत.
जुने फलक चांगले करण्याऐवजी बांधकाम विभागाने नवीन फलकांवर लाखो रु पयांची उधळण केली आहे. या रस्त्यांवर नवीन फलक लावण्यास बांधकाम खात्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना वेळ मिळाला. परंतु जे फलक झाडा-झुडपांत अडकलेले आहेत व काही फलक जमीनदोस्त झाले आहेत, अशा फलकांवर लक्ष देण्याची मागणी बांधकाम विभागाकडे नागरिक करीत आहेत.
नेरळ - कळंब रस्त्यावर ४६ फलक लावण्यात आले असून यावर सुमारे ६ लाख रु पये खर्च करण्यात आला आहे. तसेच या रस्त्यावरील जुने आडवे झालेले किंवा झुडपांच्यात अडकलेले फलक आहेत. ते चांगले करण्यात येतील व जे फलक जमीनदोस्त झाले आहेत असे फलक बांधकाम विभागाच्या स्टोअररूममध्ये जमा करण्यात येतील.
- पी. टी. सूर्यवंशी, शाखा अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग कर्जत
नेरळ - कळंब रस्त्यावर अनेक आवश्यक ठिकाणी फलक लावण्यात आले नाहीत व अनेक गावचे फलक आडवे तर काही जमीनदोस्त झाले आहेत. ते सारखे करण्याऐवजी नवीन फलकांवर लाखोंचा खर्च कशासाठी? तसेच पोशीर गावापासून पोही फाट्यापर्यंत एकही फलक लावण्यात आलेला नाही.
- यशवंत भवारे,
ग्रामस्थ, दहिवली