बेळगावात लष्करी साहित्याचा प्रकल्प
By Admin | Updated: September 8, 2015 01:06 IST2015-09-08T01:06:18+5:302015-09-08T01:06:18+5:30
मनोहर पर्रीकर यांची घोषणा : कायमस्वरूपी डिफेन्स पीएस ठेवण्याचा विचार

बेळगावात लष्करी साहित्याचा प्रकल्प
बेळगाव : गोवा, कोल्हापूर, धारवाड, कोकणातील उद्योजकांना वाव देण्यासाठी मेक इन इंडियाच्या माध्यमातून बेळगाव परिसरात लष्करी साहित्य निर्मितीचा प्रकल्प उभारण्याची घोषणा केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सोमवारी येथे केली. बेळगावात कायमस्वरूपी संरक्षण खात्याचा स्वीयसचिव ठेवण्याचा विचारही त्यांनी व्यक्त केला.
येथील उद्यमनगरातील फौंड्री क्लस्टरच्यावतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी क्लस्टरचे अध्यक्ष राम भंडारी होते.
यावेळी बोलताना पर्रीकर पुढे म्हणाले, बेळगावशी माझा पूर्वीपासून संबंध आहे. येथील फौंड्रीमध्ये मी कोट्यवधीचा व्यवसाय केला आहे. रविवारी बंगलोरमध्ये होतो. तेव्हा तेथे पाऊस झाला. आज बेळगावात आलो येथेही पाऊस झाला. महाराष्ट्रात गंभीर दुष्काळी स्थिती आहे. तेथे पाऊस हवा आहे. मी जाईन तेथे पाऊस पडू लागल्याने मला आता महाराष्ट्रातील लोकही बोलावतील, असेही विनोदाने ते म्हणाले. म्यानमारमधील आॅपरेशनमध्ये बेळगावच्या २१ पॅरा दलाच्या तुकडीने मोठी कामगिरी बजावल्याचेही पर्रीकर यांनी यावेळी सांगितले. वन रँक वन पेन्शन लागू झाल्याने एक काळजी मिटली असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
कोल्हापुरात संरक्षण प्रकल्प उभारा : उद्योजकांची मागणी
बेळगाव : संरक्षण खात्याशी संबंधित उद्योग कोल्हापुरातही उभारावा, अशी मागणी कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनच्या उद्योजकांच्या शिष्टमंडळाने सोमवारी केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली.
या निवेदनात म्हटले आहे की, कोल्हापुरात शिवाजी उद्यमनगर, गोकुळ शिरगाव, शिरोली, कागल या चार मुख्य औद्योगिक वसाहती आहेत. या ठिकाणी सुमारे दहा कारखान्यांत सुमारे ५० हजार कामगार कर्मचारी कार्यरत आहेत.
येथील उद्योजक कष्टाळू आणि कल्पक असून नवनिर्मिती करण्यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. त्यामुळे आपल्या संरक्षण खात्याला लागणाऱ्या विविध वस्तूंचा पुरवठा करण्याची येथील उद्योजकांची इच्छा आहे. तशी त्यांच्याकडे क्षमताही आहे. कोल्हापुरातही जवळपास २५० फौंड्रीज कार्यरत आहेत.
मेक इन इंडियाच्या माध्यमातून कोल्हापुरातही संरक्षण खात्याशी संबंधित एखादा प्रकल्प सुरू करावा यामुळे येथील उद्योगांना फायदा होईल. त्याचप्रमाणे कोल्हापुरात सार्वजनिक क्षेत्रातील एखादा प्रकल्प उभारल्यास उद्योगांना उर्जीतावस्था मिळेल.
या निवेदनावर अध्यक्ष संजय अंगडी, उपाध्यक्ष बाबासो कोंडेकर, सचिव नितीन वाडेकर, अतुल आरवाडे, कमलाकांत कुलकर्णी आदींच्या सह्या आहेत.