मेघे पिता-पुत्रांचा काँग्रेसला रामराम

By Admin | Updated: June 10, 2014 01:14 IST2014-06-10T01:14:37+5:302014-06-10T01:14:37+5:30

काँग्रेसचे विदर्भातील ज्येष्ठ नेते व माजी खासदार दत्ता मेघे यांनी त्यांचे पुत्र व माजी आमदार सागर मेघे आणि युवक काँग्रेसचे नेते समीर मेघे यांच्यासह काँग्रेसला रामराम ठोकला आहे.

Megha's father-son's Congress RR Ram | मेघे पिता-पुत्रांचा काँग्रेसला रामराम

मेघे पिता-पुत्रांचा काँग्रेसला रामराम

कांबळे, देशमुखांवर फोडले खापर :   ५ जुलैला कार्यकर्त्यांंसह भाजप प्रवेश
नागपूर : काँग्रेसचे विदर्भातील ज्येष्ठ नेते व माजी खासदार दत्ता मेघे यांनी त्यांचे पुत्र  व माजी आमदार सागर मेघे आणि युवक काँग्रेसचे नेते समीर मेघे  यांच्यासह काँग्रेसला रामराम ठोकला आहे. येत्या ५ जुलैला ते भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत वर्धा लोकसभा मतदारसंघातून मेघे पुत्र सागर यांचा दारुण पराभव झाला  होता. पुत्राच्या पराभवामुळे  व्यथित झालेले मेघे पक्ष सोडण्याच्या मन:स्थितीत होते. काँग्रेसमध्ये आपला कोणीही वाली राहिलेला नसल्याने पक्षात राहून उपयोग नाही, असे त्यांनी  त्यांच्या विश्‍वासू कार्यकर्त्यांंसोबत खाजगीत बोलून दाखविले होते. सोमवारी  त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे आपला राजीनामा पाठवून पक्ष सोडण्याच्या चर्चेवर   शिक्कामोर्तब केले. मेघे यांनी सोमवारी पक्षाच्या  प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आणि अ.भा. काँग्रेस समितीचे  सरचिटणीस व राज्याचे प्रभारी मोहन प्रकाश तसेच जिल्हाध्यक्षांकडेही  पाठविला आहे.
येत्या ५ जुलै रोजी पुत्र सागर, समीर आणि सर्मथक कार्यकर्त्यांंसह  भाजपात प्रवेश करणार असल्याचेही  त्यांनी स्पष्ट केले आहे. राजीनामा पत्रासह  प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनात मेघे यांनी पक्षात  होत असलेल्या कोंडीकडे लक्ष वेधले आहे. लोकसभा निवडणुकीत पक्षाचे उमेदवार सागर मेघे यांच्या   पराभवासाठी काँग्रेस नेते व राज्यमंत्री रणजित कांबळे व वर्धेचे आमदार सुरेश देशमुख कारणीभूत असल्याचा आरोपही केला. खासदार असूनही   मतदार संघातील विकासाच्या प्रश्नांबाबत पक्षाकडे आणि सरकारकडे वारंवार अर्ज, विनंत्या करूनही त्याकडे लक्ष देण्यात आले नाही, अशी खंत  त्यांनी व्यक्त केली आहे.काँग्रेसचा त्याग करताना मेघे यांनी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्याविषयी आदर व्यक्त केला आहे. त्यांनी नेहमीच चांगली  वागणूक दिल्याचे  त्यांच्या पत्रात नमूद  आहे.
नरेंद्र मोंदीवर विश्‍वास
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या  नेतृत्वाखाली देशाचा विकास घडून येईल, असा विश्‍वास जनतेला आहे व मी जनतेपैकीच एक आहे, या शब्दात मेघे यांनी  मोंदीवर विश्‍वास व्यक्त केला आहे.
 नरेंद्र मोदी व नितीन गडकरी यांच्या नेतृत्वात विदर्भाचा आणि राज्याचा विकास घडून येईल. लोकहिताचे निर्णय होतील, याची खात्री पटल्याने त्यांच्या  नेतृत्वात भाजपमध्ये काम करण्याचा निर्णय घेतलेला आहे. कोणतीही अपेक्षा व अटी न टाकता भाजपमध्ये जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.  (प्रतिनिधी)
कोंडी झाल्याने राजीनामा
-राजीनामा पत्रासह प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनात मेघे यांनी पक्षात  होत असलेल्या कोंडीकडे लक्ष वेधले आहे.
-लोकसभा निवडणुकीत पक्षाचे उमेदवार सागर मेघे यांच्या  पराभवासाठी काँग्रेस नेते व राज्यमंत्री रणजित कांबळे व वर्धेचे आमदार सुरेश देशमुख  कारणीभूत असल्याचा आरोपही केला.
-खासदार असूनही  मतदार संघातील विकासाच्या प्रश्नांबाबत पक्षाकडे आणि सरकारकडे वारंवार अर्ज, विनंत्या करूनही त्याकडे लक्ष देण्यात आले  नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे.
 

Web Title: Megha's father-son's Congress RR Ram