दुष्काळासंदर्भात उपाययोजना कराव्यात : सतेज पाटील
By Admin | Updated: May 5, 2016 20:56 IST2016-05-05T20:56:48+5:302016-05-05T20:56:48+5:30
दुष्काळासंदर्भात शासनाच्या भूमिकेवर आता संत बोलायला लागले, कोर्ट बोलायला लागलेय, शेतकरी टाहो फोडून सांगत आहे. तरीही सरकारला जाग येत नाही.

दुष्काळासंदर्भात उपाययोजना कराव्यात : सतेज पाटील
ऑनलाइन लोकमत
सांगोला, दि. ५ : दुष्काळासंदर्भात शासनाच्या भूमिकेवर आता संत बोलायला लागले, कोर्ट बोलायला लागलेय, शेतकरी टाहो फोडून सांगत आहे. तरीही सरकारला जाग येत नाही. आम्ही बोललो म्हणजे राजकीय विरोधक भांडवल करताहेत म्हणून आमच्यावर आरोप केले जातात. परंतु आता सगळेच बोलायला लागल्यानंतर तरी किमान सरकारला जाग यावी आणि दुष्काळासंदर्भात उपाययोजना कराव्यात अशी इच्छा माजी गृहराज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालक आमदार सतेज पाटील यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.
सांगोला तालुक्यातील हातीद, वाटंबरे व वाढेगाव येथे भेट देवून आमदार सतेज पाटील यांनी दुष्काळाची दाहकता समजावून घेतली. शेतकऱ्यांशी संवाद साधला. सांगोला येथे युवक काँग्रेसच्या कार्यालयात आ. पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांच्याबरोबर जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील, प्रा. प्रबुध्दचंद्र झपके, जगदीश बाबर, तालुकाध्यक्ष दत्तात्रय टापरे, शहराध्यक्ष अजयसिंंह इंगवले, पंढरपूर तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील, माढा लोकसभा युवक काँग्रेस अध्यक्ष विक्रमसिंंह भोसले, माण तालुकाध्यक्ष विशाल बागल, माढा तालुकाध्यक्ष भाऊसाहेब वाघ, करमाळ्याचे चिंंतामणी जगताप, मंगळवेढ्याचे ऋतुराज बिले, महिला जिल्हाध्यक्षा साधना उगले उपस्थित होत्या.
आ. सतेज पाटील म्हणाले, प्रदेशाध्यक्षांच्या आदेशानुसार आम्ही दुष्काळी भागाचा दोन दिवसांचा दौरा करत आहोत. अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या समस्या आहेत. लोक टँकर मागत आहेत, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण होत आहे. परंतु सरकारकडून काहीच उपाययोजना केल्या जात नाहीत. टँकर मंजूरीचे अधिकार तहसीलदारांना असतानाही ते मंजूर केले जात नाहीत.
डाळींबाच्या बागा काढा, जनावरे विका असे सल्ले सध्या सरकारी अधिकारी देत असल्याचे शेतकऱ्यांनी आपणास सांगितले. याबाबत आपण आपला अहवाल प्रदेशाध्यक्षांकडे सादर करणार आहोत. त्यानंतर दुष्काळासंदर्भात काय करायचे? त्याचा निर्णय प्रदेश पातळीवर होणार आहे. तात्पुरत्या उपाययोजना तसेच दीर्घकालीन उपाययोजना काय -काय कराव्या लागतील ते पहावे लागणार आहे.
टेंभू योजनेची रखडलेली कामे पूर्ण झाली तर पाण्याचा प्रश्न बऱ्यापैकी सुटणार आहे. त्यासाठीही आपण अहवालात कळवणार असल्याचे सांगून शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी दिली पाहिजे, बागा जगवण्यासाठी पाण्याची व्यवस्था केली पाहिजे असेही पाटील यांनी यावेळी सांगितले.