एमसीएची शरणागती
By Admin | Updated: May 16, 2014 05:24 IST2014-05-16T05:24:29+5:302014-05-16T05:24:29+5:30
गेल्या तीन दिवसांपासून मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए) आणि इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) यांच्यात रंगलेल्या कलगीतुर्यात अखेर एमसीएने शरणागती पत्करली

एमसीएची शरणागती
स्वदेश घाणेकर, मुंबई - गेल्या तीन दिवसांपासून मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए) आणि इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) यांच्यात रंगलेल्या कलगीतुर्यात अखेर एमसीएने शरणागती पत्करली. आयपीएलची अंतिम लढत वानखेडेवर व्हावी, यासाठी बंडाच्या तयारीत असलेल्या एमसीएने आयपीएल संचालन समितीच्या अटींच्या ‘गुगली’समोर माघार घेत वानखेडेवर शाहरुख खानच्या प्रवेशासह इतर अटीही मान्य केल्या. मात्र, याबाबतचा अंतिम निर्णय आयपीएल संचालन समितीच्या बैठकीत घेण्यात येईल, असे आयपीएल अध्यक्ष रंजीब बिस्वाल यांनी स्पष्ट केले. अंतिम लढत हवी असेल, तर आमच्या अटींची पूर्तता करा, असे खरमरीत पत्र मंगळवारी आयपीएल समितीने एमसीएला पाठवले होते. संचालन समितीने ठेवलेल्या सर्व अटी गुरुवारी दीड तास झालेल्या बैठकीत एमसीएच्या सदस्यांनी मान्य केले असून, त्या आशयाचे पत्रही त्यांना पाठविणार असल्याचे एमसीएचे उपाध्यक्ष रवी सावंत यांनी सांगितले. सर्व अटी मान्य केल्यानंतर तुम्ही शाहरुखला वानखेडेवर प्रवेश द्याल का? या प्रश्नावर सावंत म्हणाले, या अटींमध्ये सर्व संघमालकांना अंतिम सामना पाहण्याची परवानगी द्यावी, ही एक अट होती आणि तीही मान्य केली आहे. शाहरुख हा कोलकाता नाईट रायडर्स संघाचा मालक आहे, आणि तोही येऊ शकतो. मुंबईत ३ मे रोजी वानखेडेवर काही प्रमुख व्यक्तींना सुरक्षेच्या कारणास्तव स्टेडियमबाहेर ताटकळत बसावे लागले होते आणि त्यात पार्किंगची सोय नसल्याने मनस्ताप सहन करावा लागला होता. या सर्व प्रकाराची गंभीर दखल घेत आयपीएल संचालन समितीने तत्काळ बैठक घेऊन अंतिम सामना बंगळुरूला हलवण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाने अचंबित झालेल्या एमसीए पदाधिकार्यांनी अंतिम सामना हलविणार असाल, तर इतरही सामने नकोत, असाच पवित्रा घेतला आणि एमसीएचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे साकडे घातले. तरीही आयपीएल समितीने अटींचे पत्र पाठवून एमसीएची पुरती कोंडी केली होती.