प्रमोद सुकरे कऱ्हाड: मुंबईतील सर्वात जास्त झाडांचा खून हा आदित्य ठाकरे पर्यावरण मंत्री असताना झाला आहे. त्यांनी आपल्या महापालिकेतील विकासकाला जास्तीत जास्त फायदा व्हावा म्हणून प्रत्येक वर्षी ६ ते ७ हजार झाडांची कत्तल केली आहे. त्यामुळे त्यांना दुसऱ्यांवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही असे मत भाजपचे प्रवक्ते आशिष शेलार यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले. आदित्य ठाकरे यांनी केलेल्या ट्विट बाबत माध्यमांनी त्यांना प्रश्न केला होता.बुधवारी आशिष शेलार कराड दौऱ्यावर आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ.अतुल भोसले, प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर उपस्थित होते.शेलार म्हणाले, भारतीय जनता पक्ष आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे पक्षाची व्याप्ती वाढत आहे. भाजप मजबूत झाला तरच महायुती मजबूत होणार असून सबका साथ सबका विकास हीच भाजपची भूमिका राहिली आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मी निधी देत नाही अशी टीका करणाऱ्यांना मी पैसे खिशात घेऊन फिरतो काय? असा सवाल केला आहे. याबाबत विचारताच, मी त्याबाबत काही ऐकलेले नाही. असे सांगत त्या प्रश्नाला बगल दिली.
त्यांना बेईमानीची व्याख्या शिकवावी लागेलमहाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी एकनाथ शिंदे शिवसेनेत केलेल्या प्रवेशबाबत संजय राऊत यांनी टीका केली आहे. याबाबत छेडले असता शेलार म्हणाले, खरंतर त्यांना बेईमानी ची व्याख्या शिकवावी लागेल. कारण चंद्रहार पाटील यांनी केलेला प्रवेश हा स्वतःच्या मर्जीने केलेला प्रवेश आहे .या उलट महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात मोठी बेईमानी उद्धव ठाकरेंनी केली. त्याचे मूळ संजय राऊत आहेत. ते आमच्या बरोबर राहिले, निवडणूक लढले आणि त्यानंतर सत्तेसाठी निघून गेले. त्यांना खरंतर 'बेईमान ऑफ महाराष्ट्र' हा किताब दिला पाहिजे असा टोला त्यांनी लगावला.