ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ३१ - मुंबईचे माजी पोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी वारंवार खार पोलिस स्टेशनध्ये जाऊन अत्यंत महत्वाची केस असलेल्या शीना बोरा हत्याप्रकरणाच्या तपासात थेट हस्तक्षेप करणं चुकीचं होतं असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मारियांच्या बदलीबाबत भाष्य केले. महाराष्ट्रात युती सरकारला आज एक वर्ष पूर्ण झाल्याच्यानिमित्ताने मुख्यमंत्र्यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या विशेष मुलाखतीत अनेक विषयांवर भाष्य केले, त्याचदरम्यान त्यांनी राकेश मारियांच्या बदलीवरही स्पष्टीकरण दिले.
शीमा बोरा हत्याप्रकरणाची केस ही अत्यंत गुंतागुतीची आणि महत्वाची असून त्याचा तपासही तितका महत्वाचा आहे. मात्र तपास करण्याचे काम पोलिस अधिका-याचे काम असून तो (तपास) योग्य रितीने होत आहे की नाही यावर लक्ष ठेवण्याचे काम पोलिस आयुक्तांचे आहे. मात्र राकेश मारिया यांनी वारंवार खार पोलिस स्टेशनमध्ये जाऊन या प्रकरणात हस्तक्षेप करणं चुकीचं होतं, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले.
शीना बोरा हत्याप्रकरणाचा तपास करणारे मुंबई पोलिस आयुक्त राकेश मारियांना पोलिस महासंचालकपदी बढती देऊन त्यांच्याजागी जावेद अहमद यांची मुंबईच्या पोलिस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली. विशेष बाब म्हणजे राकेश मारियांना ३० सप्टेंबररोजी बढती मिळणे अपेक्षीत असताना २० दिवसांपूर्वीच, सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यातच त्यांना बढती देण्यात आल्याने पोलिस दलात अनेक चर्चांना उधाण आले होते. गुन्ह्यांचा शिताफीने तपास करणारे व आयुक्तपदावर असतानाही थेट रस्त्यावर उतरुन पोलिस दलाचे मनोबल वाढवणारे राकेश मारिया यांनी तीन वर्षांपूर्वी झालेल्या शीना बोरा हत्या प्रकरण उलगडले होते. ३० सप्टेंबर रोजी राकेश मारियांचा कार्यकाळ संपणार होता. त्यानंतरच मारियांना बढती मिळणे अपेक्षीत होते. बढती मिळण्यापूर्वी या प्रकरणातील महत्त्वाचे पुरावे गोळा करण्यासाठी मारिया व त्यांची टीम अथक मेहनत घेत होती. मात्र राकेश मारियांचा कार्यकाळ संपण्याआधीच त्यांना बढती देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. होमगार्डच्या पोलिस महासंचलकपदावर राकेश मारियांची नियुक्ती करण्यात आली.
पण या आकस्मिक बढतीमुळे नाराज झालेले मारिया पदाचा राजीनामा देणार अशी चर्चा सर्वत्र होऊ लागली असता खुद्द मारिया यांनाच आपण राजीनामा देणार नसल्याचे स्पष्टीकरण द्यावे लागले. दरम्यान हायप्रोफाईल शीना बोरा हत्याप्रकरणात मारियांनी विशेष लक्ष घातल्यानेच त्यांची उचलबांगडी झाल्याची चर्चा सुरू झाली आणि त्यांच्या बदलीवर सोशल मीडिया व प्रसारमाध्यमातू टीकेचा जोरकस सूर उमटला. त्यामुळेच शीना बोरा हत्याकांडाचा तपास मारिया यांच्याकडे ठेवून सरकारने सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. अखेर आज या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी आपले मौन सोडले.