मुंबईतील ६ मार्चचा मराठा क्रांती मोर्चा स्थगित

By Admin | Updated: February 27, 2017 05:16 IST2017-02-27T05:16:36+5:302017-02-27T05:16:36+5:30

इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांमुळे मुंबईत ६ मार्च रोजी आयोजित करण्यात आलेला मराठा क्रांती मोर्चा स्थगित करण्यात आला

The Maratha Kranti Morcha adjourned for March 6 in Mumbai | मुंबईतील ६ मार्चचा मराठा क्रांती मोर्चा स्थगित

मुंबईतील ६ मार्चचा मराठा क्रांती मोर्चा स्थगित


औरंगाबाद : इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांमुळे मुंबईत ६ मार्च रोजी आयोजित करण्यात आलेला मराठा क्रांती मोर्चा स्थगित करण्यात आला आहे. रविवारी औरंगाबादेत झालेल्या राज्यस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मोर्चाच्या वतीने पत्रकार परिषदेत देण्यात आली.
एमजीएमच्या रुख्मिणी सभागृहात दिवसभर मराठा क्रांती मोर्चाची राज्यस्तरीय बैठक पार पडली. राज्यातील २९ जिल्ह्यांचे मोर्चाचे समन्वयक उपस्थित होते. या बैठकीत मुंबईतील मोर्चाबाबत चर्चा झाली.
मुंबईमध्ये ६ मार्च रोजी आयोजित या मोर्चाच्या तयारीसाठी जिल्हा
आणि तालुकास्तरांवर बैठका सुरू झाल्या होत्या. मात्र दहावी व बारावीची परीक्षा असल्याचे समोर आले. या परीक्षांमुळे विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांनाही मोर्चात सहभागी होता येणार नसल्याने मोर्चा पुढे ढकलावा, अशी विनंती केली होती. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन आणि पालकांचे म्हणणे विचारात घेऊन ६ मार्च रोजीचा मुंबईतील मोर्चा स्थगित करण्याचा निर्णय या राज्यस्तरीय बैठकीत सर्वानुमते घेण्यात आल्याचे संयोजकांनी सांगितले.
मुंबईतील मोर्चाची पुढील तारीख निश्चित करण्यासाठी लवकरच औरंगाबादेत राज्यस्तरीय कोअर कमिटीची बैठक होणार आहे.
राज्यस्तरीय कोअर कमिटी
आतापर्यंत ५७ मूक मोर्चे काढण्यात आले. या मोर्चाने संपूर्ण जगाला शिस्त आणि संयमाचे दर्शन घडविले आहे. मुंबईतील मोर्चाही विनागालबोट व्हावा, यासाठी तालुकास्तर, जिल्हास्तर आणि राज्यस्तरावर कोअर कमिट्या स्थापन केल्या जाणार आहेत. प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येकी सात सदस्य राज्यस्तरीय कोअर कमिटीचे सदस्य असतील आणि राज्यस्तरीय कमिटीवरील सर्व सदस्य अराजकीय असतील आणि मराठा क्रांती मोर्चाचा कोणताही निर्णय ही कोअर कमिटीच घेईल. कोअर कमिटीशिवाय मराठा क्रांती मोर्चाबद्दल कोणी कोणतीही भूमिका मांडल्यास ती त्या व्यक्तीची वैयक्तिक भूमिका असेल. शिवाय मराठा क्रांती मोर्चाने कोणासही प्रवक्ता म्हणून नियुक्त केलेले नाही, असेही
या मोर्चातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
>निषेधाचे दोन ठराव
रविवारच्या बैठकीत आ. प्रशांत परिचारक आणि पोलीस प्रशासनाचा निषेध करणारा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. सैन्य दलातील जवानांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य आ. परिचारक यांनी केले होते. तसेच चक्का जाम करणाऱ्या औरंगाबादेतील मराठा तरुणांवर पोलिसांनी मुद्दामहून लाठीहल्ला केला होता.

Web Title: The Maratha Kranti Morcha adjourned for March 6 in Mumbai