अनेकांनी गमावली कुटुंबे
By Admin | Updated: August 1, 2014 01:01 IST2014-08-01T01:01:42+5:302014-08-01T01:01:42+5:30
गावातील दुर्घटनेत अनेकांनी आपली संपूर्ण कुटुंबेच गमावली आहेत, तर काहींचा वंशच संपण्याचीही भीती आहे

अनेकांनी गमावली कुटुंबे
माळीण : गावातील दुर्घटनेत अनेकांनी आपली संपूर्ण कुटुंबेच गमावली आहेत, तर काहींचा वंशच संपण्याचीही भीती आहे. येथील भागू सोनू दांगडे यांच्या कुटुंबातील कोणीही वाचण्याची शक्यता नाही. शेतीचा व्यवसाय करणाऱ्या दांगडे कुटुंबातील भागू दांगडे यांच्यासह त्यांच्या पत्नी सुमन दांगडे आणि दोन मुले, तर थोरला भाऊ संदीप दांगडे आणि त्यांच्या पत्नीसह चार वर्षांचा मुलगा अद्यापही बेपत्ता आहे. निसर्गरम्य गाव झालं होत्याचं नव्हतं.आंबेगाव तालुक्यात दोन वेळा तहसीलदार म्हणून काम केलेले पुनाजी रामचंद्र कोथरे यांचे १५ ते १६ नातेवाईक बेपत्ता झाले आहेत. ते म्हणाले, ‘‘गेली २० ते २५ वर्षे मी येथे येत आहे. माझी सासरवाडी येथे आहे. सध्या फक्त मोकळं घर होतं, ते गाडलं गेलं. मी दोन वेळा तहसीलदार म्हणून काम केल्याने मला या गावाची बारकाईने माहिती आहे. खूप सुंदर आणि निसर्गरम्य गाव होते. मात्र, आता हे गावच नष्ट झाले आहे. ’’
...पण तो आलाच नाही!
दिगत या माळीण गावापलीकडेच असणाऱ्या गावातील लीला कारोटे या भातआवणीसाठी गावाला आल्या होत्या. त्यांच्या बहिणीचे हे गाव. सहा महिन्यांपूर्वीच त्या बहिणीच्या दहाव्याला आल्या होत्या. बहिणीच्या मुलाने मावशीकडे येणार म्हणून सांगितले होते. पण आज या घटनेची माहिती समजली. मेव्हणे आणि त्यांचा मुलगा बेपत्ता आहे. लीलाबार्इंना हे सांगताना गहिवरून आले होते.
वडिलांच्या दशक्रियेसाठी आलेल्या मुलीवर काळाचा घाला
गोहे येथे अश्विनी काळूराम भवारी या आपल्या दोन मुलांसमवेत वडिलांच्या दशक्रिया विधीसाठी आल्या होत्या. कालच्या घटनेत अश्विनी यांच्यासह त्यांचा मुलगा आर्यन (वय ४) आणि श्रावणी (वय ५) या तिघांचा मृत्यू झाला. माळीणपासून ३५ किलोमीटर अंतरावर असलेल्या गोहे गावात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.