फेरीवाल्यांचा मनपावर मोर्चा
By Admin | Updated: June 30, 2016 02:49 IST2016-06-30T02:49:30+5:302016-06-30T02:49:30+5:30
महापालिकेने अतिक्रमणांच्या विरोधात धडक मोहीम सुरू केली आहे.

फेरीवाल्यांचा मनपावर मोर्चा
नवी मुंबई : महापालिकेने अतिक्रमणांच्या विरोधात धडक मोहीम सुरू केली आहे. याअंतर्गत पदपथांवरील फेरीवाले व बेकायदा झोपड्यांवर कारवाई करण्यात येत आहे. या कारवाईच्या निषेधार्थ महाराष्ट्र हॉकर्स फेडरेशनच्या वतीने बुधवारी महापालिका कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात फेरीवाल्यांसह शहरातील झोपडीधारकही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शहरातील मार्जिनल स्पेस व फेरीवाल्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून शहरातील पदपथांनी मोकळा श्वास टाकला आहे. असे असले तरी फेरीवाल्यांचे कोणतेही नियोजन न करता ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप फेरीवाला संघटनेने केला आहे. कारवाई करण्यापूर्वी फेरीवाल्यांना पर्यायी जागा देणे आवश्यक होते, असेही त्यांचे म्हणणे आहे. तसेच पावसाळ्यात निवासी घरांवर कारवाई करणे गैर आहे. असे असतानाही अनेक ठिकाणच्या झोपड्या जमीनदोस्त करण्यात आल्या. या सर्वांचा विरोध करण्यासाठी बुधवारी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. फेरीवाल्यांच्या पुनर्वसनाचा निर्णय होईपर्यंत त्यांच्यावर कारवाई करू नये, कारवाईत जप्त केलेला माल संबंधित फेरीवाल्यांना परत द्यावा, पावसाळ्यात झोपड्यांवरील कारवाई थांबवावी आदी मागण्या मोर्चेकऱ्यांकडून करण्यात आल्या. कामगार नेते प्रफुल्ल म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चात शिवसेनेचे माजी शहरप्रमुख हरिभाऊ म्हात्रे, उपजिल्हाप्रमुख मनोहर गायखे, महिला संघटक रंजना शिंत्रे आदींचा सहभाग होता.
दरम्यान, मोर्चाच्या शिष्टमंडळाने महापालिकेचे उपायुक्त सुहास शिंदे व सह आयुक्त डॉ. कैलास गायकवाड यांची भेट घेवून आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. प्रलंबित मागण्यांसंदर्भात सकारात्मक कार्यवाही न झाल्यास येत्या काळात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा यावेळी प्रशासनाला देण्यात आला आहे. (प्रतिनिधी)