नगराध्यक्ष माने यांचा आत्मदहनाचा इशारा
By Admin | Updated: June 20, 2014 00:15 IST2014-06-19T23:37:06+5:302014-06-20T00:15:17+5:30
जलशुध्दीकरण केंद्राचे जागा हस्तांतरणाचा प्रश्न ७ दिवसात जागा न मिळाल्यास जिल्हाधिकारी यांचे कक्षात आत्मदहन करण्याचा इशारा

नगराध्यक्ष माने यांचा आत्मदहनाचा इशारा
खामगाव : जलशुध्दीकरण केंद्राचे जागा हस्तांतरणाचा प्रश्न राजकारणामुळे अडकलेला असून वारंवार पाठपुरावा करुनही प्रतिसाद मिळत नाही. याबाबत ७ दिवसात जागा न मिळाल्यास जिल्हाधिकारी यांचे कक्षात ठिय्या आंदोलन करुन आत्मदहन करण्याचा इशारा नगराध्यक्ष गणेश माने यांनी दिला आहे. केंद्र शासन पुरस्कृत यूआयडीएसएसएमटीयोजने अंतर्गत वाढीव पाणीपुरवठा योजना मन धरणावरुन मंजूर झालेली असून या योजनेसाठी ११.६८ कोटी रुपये अतिरिक्त अनुदान राज्य शासनाने मंजूर केले आहे. या योजनेच्या मंजूर कामापैकी ७५ टक्के कामे पूर्ण झालेली असून उर्वरित कामे सुरु आहेत. वाढीव पाणी पुरवठा ही मुळ योजना ६३.६५ कोटी रुपये टेंडर किंमतीची असून केंद्र व राज्य शासनाकडून या प्रकल्पास आता पर्यंत फक्त ४४.६७ कोटी रुपये अनुदान मिळाले. सदर अनुदानातून न.प. ने स्वत:चा निधी ७.७२ कोटी असे असून एकूण ५२ कोटी रुपये खर्च झाला. योजनेची कामे मार्गी लावण्यासाठी निधीची कमतरता होती. हा निधी न.प. ला कर्जाद्वारे उभारावयाचा होता. मात्र सदर कर्जाचा भार हा दरडोई नागरिकांवर येणार होता. त्यामुळे अतिरिक्त निधीसाठी आमदार राजेंद्र शिंगणे यांच्या मार्गदर्शनात नगराध्यक्ष गणेश माने यांनी मुख्याधिकारी नामवाड यांच्यावतीने पाणी पुरवठा उपअभियंता संजय मोकासरे यांच्या माध्यमातून मंत्रालय स्तरावर प्रश्न रेटून धरला. त्यानुसार उपमुख्यमंत्री यांनी राज्यातील इतर नगर पालिकांच्या तुलनेत सर्वाधिक ११.६८ कोटी रुपयांचे अनुदान मंजूर केले आहेत. हा निधी २0 मे २0१४ रोजी जिल्हाधिकारी बुलडाणा यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे. राज्यशासनाकडून वाढीव निधी प्राप्त झाल्याने वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम योजनेमधून शाहराची वाढीव पाणीपुरवठा योजनेची संपूर्ण प्रलंबित कामे १00 टक्के पूर्ण होऊन वाटर मिटरच्याही खर्चाची तरतूद न.प. ला करता येणार आहे. व योजनेसाठी कोणतीही कर्ज उभारणी करण्याची आवश्यकता पडणार नाही. याशिवाय न.प. खर्चाचेही परतफेडीचेही दायीत्व कमी होत आहे. तसेच वाटर मिटरचा भार नागरिकांना सोसावा लागणार नाही. मागीलवर्षी अतवृष्टीच्या पुराचे पावसाने मन धरण १00 टक्के भरल्याने धरणावरील विहिरीचे खोदकाम, बांधकाम, ब्रीज यांचे काम पाण्यात बुडाल्याने बंद झाले होते. आता धरणाची पातळी घटल्याने व सिंचनास पाणी सोडल्याने युध्द पातळीवर कामाला सुरुवात करण्यात आली आहे. तसेच शहरातील वितरण व्यवस्थेची टेस्टींग व बुस्टर व इतर कामेही युध्दपातळीवर सुरु करण्यात आली आहे. नगर पालिका प्रशासन स्वत:च्या खर्चाने नागरिकांना जलमापक यंत्र बसवून देणार आहे. त्यामुळे खामगाव हे दिवसरात्र पाणी पुरवठा करणारे राज्यातील पहिले मध्यम स्वरूपाचे शहर ठरणार आहे.