मल्ल्यांच्या कर्ज घोटाळ्यात बँकांचीही होणार चौकशी?
By Admin | Updated: June 27, 2016 04:59 IST2016-06-27T04:59:12+5:302016-06-27T04:59:12+5:30
उद्योेगपती विजय मल्ल्या यांना कर्ज देताना बँकांनीही काही गैरप्रकार केले का, याची चौकशी ‘सिरियस फ्रॉड इन्व्हेस्टिगेशन आॅफिस’ (एसएफआयओ)ने सुरू केली आहे.

मल्ल्यांच्या कर्ज घोटाळ्यात बँकांचीही होणार चौकशी?
मुंबई : आता गाशा गुंडाळलेल्या किंगफिशर एअरलाइन्सच्या नावे सरकारी बँकांची नऊ हजार कोटी रुपयांची कर्जे बुडवून परदेशात जाऊन बसलेले उद्योेगपती विजय मल्ल्या यांना कर्ज देताना बँकांनीही काही गैरप्रकार केले का, याची चौकशी ‘सिरियस फ्रॉड इन्व्हेस्टिगेशन आॅफिस’ (एसएफआयओ)ने सुरू केली आहे.
खासकरून सरकारी बँकांमध्ये होणाऱ्या घोटाळ्यांचा तपास करणारी ‘एसएफआयओ’ ही विशेष यंत्रणा असून, त्यांत विविध तपासी संस्थांच्या अधिकाऱ्यांचा समावेश असतो. संशयित घोटाळ्याचे गांभीर्य व व्याप्ती लक्षात घेऊनच त्याच्या तपासाचे काम या यंत्रणेकडे सोपविले जाते. ‘एसएफआयओ’ने मल्ल्यांच्या ‘कर्जघोटाळ्या’त लक्ष घालावे यावरूनच या व्यवहारात बँकांचे हातही स्वच्छ नसावेत, याविषयी सरकारला सकृतदर्शनी ठाम शंका असल्याचे मानले जात आहे.
सरकारी बँकांमधील एका वरिष्ठ सूत्राने सांगितले की, किंगफिशरला कर्जे दिलेल्या सर्व बँकांकडून ‘एसएफआयओ’ने अलीकडेच या कर्जांसंबंधीचा सर्व तपशील मागविला व बँकांनीही ती माहिती दिली आहे. यावरून कर्ज देताना सर्व नियमांचे कसोशीने पालन केले गेले होते की नाही हे तपासले जाणार असल्याचे उघड आहे.
‘एसएफआयओ’ किंगफिशर एअरलाइन्समधील कथित वित्तीय गैरव्यवहारांची चौकशी करीत असल्याचे वित्तमंत्री अरुण जेटली यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या
लेखी उत्तरात अलीकडेच सांगितले होते.
हा तपास सुरू असल्याने अधिक सांगणे योग्य होणार नाही, असे जेटली म्हणाले होते. हा संदर्भ कर्ज घेणाऱ्याच्या संबंधात होता. आता ‘एसएफआयओ’ करत असलेला तपास दुसऱ्या बाजूने म्हणजे कर्ज देणाऱ्यांच्या बाजूने होत आहे.
आयडीबीआय बँकेच्या ९०० कोटी रुपयांच्या कर्जाच्या संदर्भात सुरू असलेल्या तपासात वारंवार समन्स काढूनही मल्ल्या चौकशीसाठी न आल्याने अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) केलेल्या अर्जावर मनी लॉड्रिंग प्रतिबंधक कायद्याखालील विशेष न्यायालयाने १४ जून रोजी मल्ल्या यांना ‘फरार’ घोषित केले होते. याच प्रकरणात ‘ईडी’ने मल्ल्या आणि त्यांच्या युनायटेड ब्रुअरिज (यूबी) या कंपनीच्या १,४११ कोटी रुपयांच्या मालमत्तांवर टाच आणली आहे.
किंगफिशर प्रकरणात कर्ज देणाऱ्या १७ बँकांनी कर्ज वसुली न्यायाधिकरणात तगादा लावल्यानंतर गेल्या ७ मार्च रोजी मल्ल्या डिप्लोमॅटिक पासपोर्टवर लंडनला निघून गेले ते परत आलेले नाहीत. (विशेष प्रतिनिधी)