सामाजिक बहिष्कारावर कडक कायदा करणार

By Admin | Updated: December 30, 2014 02:27 IST2014-12-30T02:27:54+5:302014-12-30T02:27:54+5:30

रायगड जिल्ह्यातील सामाजिक बहिष्काराचे (वाळीत टाकण्याचे) प्रकार अत्यंत गंभीर आहेत.

Make strict laws against social boycott | सामाजिक बहिष्कारावर कडक कायदा करणार

सामाजिक बहिष्कारावर कडक कायदा करणार

मुख्यमंत्री फडणवीस यांचे आश्वासन
अलिबाग : रायगड जिल्ह्यातील सामाजिक बहिष्काराचे (वाळीत टाकण्याचे) प्रकार अत्यंत गंभीर आहेत. दोषींवर कारवाई करण्यासाठी राज्य सरकार नवा कायदा करेल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिले.
अलिबाग नगर परिषदेच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी समारंभानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, वाळीत टाकणाऱ्यांवर कारवाई करणारा कायदा सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणात रद्दबातल ठरवला, तर दुसऱ्या विधेयकाचे रूपांतर कायद्यात होऊ शकले नाही. मात्र दोन्हींचा अभ्यास करून सामाजिक बहिष्कारांच्या घटनांना आळा घालून कारवाई करण्यासाठी नवा कायदा करण्याचे सूतोवाच त्यांनी केले. सद्य:स्थितीत गुन्ह्याचे दोषारोप पत्र न्यायालयात सादर करण्यासाठी आवश्यक असणारी राज्य सरकारची परवानगी तत्काळ देण्यासंदर्भात आदेश देण्यात येईल, असेही फडणवीस म्हणाले. संभाव्य दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी, कोकणची सागरी सीमा सुरक्षा बळकट करण्यात येईल. शिवकालीन सागरी किल्ल्यांचा वापर करण्यासाठी भारतीय नौदल आणि भारतीय पुरातत्त्व विभाग या केंद्र सरकारच्या विभागांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. (विशेष प्रतिनिधी)

पर्यटनस्थळ घोषित करणे विचाराधीन
अलिबागला पर्यटनस्थळ म्हणून घोषित करणे विचाराधीन आहे. राज्याच्या पर्यटन विभागाशी चर्चा करून अंतिम निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. अलिबाग समुद्रात अनेकदा पोहण्याचा आनंद घेतला. पण आता मुख्यमंत्री झाल्यामुळे पर्यटक म्हणून येथे येता येत नाही, अशी खंत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.

Web Title: Make strict laws against social boycott

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.