...तर महाराष्ट्राचा अफगाण होईल!
By Admin | Updated: October 2, 2015 04:21 IST2015-10-02T04:21:07+5:302015-10-02T04:21:07+5:30
सनातन संस्थेत मानवी बॉम्ब तयार केले जात असून त्यांना रोखले नाही, तर लवकरच महाराष्ट्राचा अफगाणिस्तान होईल, अशी भीती अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष श्याम मानव

...तर महाराष्ट्राचा अफगाण होईल!
मुंबई : सनातन संस्थेत मानवी बॉम्ब तयार केले जात असून त्यांना रोखले नाही, तर लवकरच महाराष्ट्राचा अफगाणिस्तान होईल, अशी भीती अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष श्याम मानव यांनी गुरुवारी व्यक्त केली.
मुंबई मराठी पत्रकार संघात घेतलेल्या पत्रकार परिषदेत मानव यांनी, सनातनचे संस्थापक डॉ. जयंत आठवले यांनी लिहिलेल्या पुस्तकांचा आधार घेत सनातनवर गंभीर आरोप केले. सनातनविरोधात असलेल्या पोलीस, पुरोगामी कार्यकर्ते आणि सामाजिक कार्यकर्ते हे पाताळातील सैतान
असल्याची भावना साधकांमध्ये रुजवली जात असल्याचा दावाही त्यांनी केला. सनातनच्या आश्रमांमध्ये टप्प्याटप्प्याने साधकांचे ब्रेनवॉश करून सर्व प्रकार घडवले जात आहेत.
डॉ. जयंत आठवले यांनी १९८३ साली लिहिलेल्या ‘क्लिनिकल हिप्नोसिस’ या पुस्तकात आठवले यांनी हॅल्युसिनेशन्स प्रकारात व्यक्तीला वेगवेगळे भास निर्माण करता येतात, असा दावा केला आहे. शिवाय संमोहित करण्याच्या प्रकारात एखाद्या व्यक्तीच्या हातून हवी तशी घटना घडवली जाते. मात्र ती घटना केल्यानंतर संबंधित व्यक्ती पकडली गेली, तर जीव जाईपर्यंत मारहाण केली तरी ती व्यक्ती काय केले? कसे केले? कुठे केले? आणि कोणाच्या सांगण्यावरून केले? हे सांगू शकत नाही. कारण त्या व्यक्तीला काहीच आठवत नाही.
हे ध्यानी घेता डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या मारेकऱ्यांना पोलिसांनी पकडले, तरी त्यांचे ब्रेनवॉश केल्याची शक्यता असल्याने कबुलीजबाब मिळणे कठीण असल्याचा दावाही त्यांनी केला.
आश्रमात गैरकृत्ये नाहीत -सनातनचा दावा
पणजी : सनातनच्या रामनाथी आश्रमात कोणत्याही गैरकृत्ये होत नाहीत. त्यामुळे आश्रम हटविण्याचा प्रश्नच येत नाही, असे सनातन संस्थेच्या व्यवस्थापनाने म्हटले आहे. तसेच राज्य सरकारने श्रीराम सेनेवर घातलेली बंदी चुकीची असल्याचे मत सनातन प्रभातचे माजी समूह संपादक दुर्गेश सामंत, हिंदू जनजागृती समितीचे राज्य समन्वयक मनोज सोळंकी, महेश पारकर यांनी पत्रकार परिषद व्यक्त केले. रामनाथ युवा संघाने हा आश्रम हटविण्यासाठी ७ दिवसांची मुदत दिली असून अन्यथा मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर आरोप खोडून काढण्यासाठी ही पत्रकार परिषद होती.
——————
अहवालानंतरच निर्णय - पार्सेकर
सनातन संस्थेबाबत अगोदर महाराष्ट्राच्या गृह खात्याचा अहवाल येऊ द्या. त्या अहवालातील निष्कर्ष पाहिल्यानंतरच त्या विषयी गोवा सरकार काय ती पाऊले उचलू शकेल, असे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी गुरुवारी सांगितले.
राजभवनवर राजेंद्र आर्लेकर यांचा मंत्रीपदी शपथविधी पार पडल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. सनातन ही दहशतवादी संघटना असल्याचे तुम्हाला वाटते काय, असे पत्रकारांनी विचारले असता, आम्हाला तसा अनुभव आलेला नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले. मात्र माझे व्यक्तिगत मत काहीही असले, तरी महाराष्ट्राच्या गृह खात्याकडून कोणते निष्कर्ष काढले जातात, ते पाहावे लागेल.