महाराष्ट्र तृतीय स्थानी
By Admin | Updated: October 20, 2015 00:20 IST2015-10-19T23:27:07+5:302015-10-20T00:20:53+5:30
राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा : गतवर्षीच्या पराभवाचा काढला वचपा

महाराष्ट्र तृतीय स्थानी
सांगली : आक्रमक चढाया आणि कौशल्यपूर्ण पकडींचे समीकरण साधत महाराष्ट्राच्या मुलांच्या संघाने राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला.हैदराबाद (आंध्र प्रदेश) येथे २७ वी राष्ट्रीय किशोर-किशोरी कबड्डी स्पर्धा पार पडली. महाराष्ट्राच्या मुलांच्या संघाने पंजाब, गुजरात, उत्तराखंड व तेलंगणा आदी राज्यांच्या संघांचा पराभव करून उपांत्य फेरीत धडक मारली. उपांत्य फेरीत महाराष्ट्राला अनुभवी मध्य प्रदेशशी टक्कर द्यावी लागली. मध्य प्रदेशने सुरुवातीपासूनच बचाव फळी भक्कम ठेवली. महाराष्ट्राने केलेल्या वर्मी घावामुळे मध्यंतरानंतर मध्य प्रदेशचा संघ घायाळ झाला. मात्र चपळ खेळाडूंचा भरणा असलेल्या मध्य प्रदेशने पुन्हा विजयाकडे झेपावत महाराष्ट्राला दोन गुणांनी पराभूत केले. त्यामुळे महाराष्ट्रास तृतीय क्रमांकावर समाधान मानावे लागले. महाराष्ट्राचा यशस्वी संघ असा : राजू काथोरे (ठाणे), सदाशिव चुरी (सांगली), गणेश आवळे (पुणे), सनी मते (नाशिक), अनिकेत तेवरे (सांगली), अभिषेक सोळंकी (मुंबई उपनगर), शुभम सुतार (मुंबई उपनगर), विनायक कांबळे (कोल्हापूर), सचिन ढवळे (बीड), अस्लम इनामदार (अहमदनगर), रोहित मोकल (रायगड), कृष्णा राठोड (औरंगाबाद). राखीव : अविष्कार साळवी (रत्नागिरी), अक्षय कदम (कोल्हापूर), स्वप्नील पवार (सातारा). दरम्यान, राष्ट्रीय स्पर्धेतील विजेत्या मुलांच्या संघाचे आणि निवड समिती सदस्य विजय साळुंखे व सुनील कुंभार यांचे तरुण भारत व्यायाम मंडळाचे अध्यक्ष शिवाजी सगरे, उपाध्यक्ष महेश पाटील व सर्व पदाधिकाऱ्यांनी दूरध्वनीवरून अभिनंदन केले. (क्रीडा प्रतिनिधी)