लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळाच्या ताफ्यात दीड हजार नवीन बस दाखल झाल्या असल्या तरी यंदा एप्रिल ते जून या उन्हाळ्याच्या सुट्टीच्या हंगामात प्रवाशांच्या संख्येत सरासरी २० लाख रुपयांनी घट झाली आहे. त्यामुळे अपेक्षेप्रमाणे उत्पन्न मिळाले नाही. तिकीट भाडेवाढ, अस्वच्छ आगार, वेळेवर सेवा नसणे अशा अनेक कारणांमुळे प्रवाशांनी एसटीकडे पाठ फिरविल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
दरवर्षी एप्रिल ते जून हा कालावधी एसटीसाठी उत्पन्नाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असतो. लग्नसराई आणि शाळा-कॉलेजना असलेल्या सुट्ट्यांमुळे ग्रामीण, तसेच शहरी भागांत एसटीचे प्रवासी वाढतात. मात्र, यंदा या गर्दीच्या तीनही महिन्यांमध्ये प्रवासी संख्या सरासरी २० लाखांनी घटली आहे. २४ जानेवारी २०२५ रोजी एसटीचे तिकीट भाडे १५ टक्क्यांनी वाढवण्यात आले.
भाडेवाढीनंतर उत्पन्न वाढेल, अशी अपेक्षा होती; पण एप्रिलमध्ये ८.५ टक्के, मे महिन्यात १२.६ टक्के आणि १५ जूनपर्यंत केवळ १२.५ टक्के वाढ नोंदवली गेली. भाडेवाढीमुळे काही प्रमाणात उत्पन्न वाढले असले, तरी ते अपेक्षित उत्पन्नाच्या तुलनेत कमी आहे.
तज्ज्ञांचे म्हणणे काय?एसटीचे ३१ विभाग व २५१ आगारांपैकी अनेक भाग तोट्यात आहेत. ठाणे, पुणे, कोल्हापूर, नागपूर, सोलापूर आणि छत्रपती संभाजीनगर हे मोठे विभाग सातत्याने तोट्यात असून, ते रोखण्यासाठी ठोस उपाययोजना झालेल्या नाहीत. नफ्यात असलेल्या विभागांचे योगदानही एकूण आर्थिक स्थिती सुधारण्यात अपुरे पडत आहे. तोट्यातील आगारांना ‘कारणे दाखवा’ नोटीस पाठवली जाते; पण कौशल्य विकास, समुपदेशन किंवा कार्यपद्धतीत सुधारणा करण्यासाठी ठोस पावले उचलली जात नाहीत. परिणामी, वाढीव भाडेवाढीचे फायदेही एसटीला मिळताना दिसत नाहीत, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.