‘आप’ची महाराष्ट्र प्रदेश शाखा विसर्जित
By Admin | Updated: October 2, 2015 03:53 IST2015-10-02T03:53:14+5:302015-10-02T03:53:14+5:30
चानक घडलेल्या राजकीय घडामोडीत दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी पक्षाची महाराष्ट्र प्रदेश शाखा विसर्जित केली.

‘आप’ची महाराष्ट्र प्रदेश शाखा विसर्जित
हरीश गुप्ता,नवी दिल्ली
अचानक घडलेल्या राजकीय घडामोडीत दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी पक्षाची महाराष्ट्र प्रदेश शाखा विसर्जित केली. ‘आप’ने महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका लढवायच्या नाही, असा निर्णय घेतल्यापासूनच पक्षाची प्रदेश शाखा तशी निष्क्रियच बनलेली होती. परंतु केंद्रीय नेतृत्वाने स्वत:ला राज्यातील कार्यवाहीपासून स्वत:ला वेगळे न ठेवल्याने प्रदेश शाखा कागदावर अस्तित्वात होती.
प्रदेश शाखेचे नेतृत्व करणारे आणि पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य असलेले मयंक गांधी यांनी केजरीवाल यांच्या या निर्णयावर सडकून टीका केली. राष्ट्रीय कार्यकारिणीतील बहुतांश सक्रिय सदस्यांनी याआधीच पक्ष सोडलेला आहे. तथापि, पक्षाच्या राजकीय कामकाज कमिटीने महाराष्ट्र प्रदेश शाखा विसर्जित करण्याचा निर्णय घेतल्याचा दावा ‘आप’ने एका निवेदनात केला आहे.
त्यावर मयंक गांधी यांनी संतप्त प्रतिक्रिया दिलेली आहे. ‘राजकारणाचे दोन प्रकार. एक प्रत्यक्ष लोकांसमवेत काम करणारे आणि दुसरे दिल्लीत ‘चापलुसी’ करणारे. या दुसऱ्या प्रकारचे राजकारण विजयी झाले आहे. जय हो,’असे टिष्ट्वट करून गांधी यांनी आपला रोष व्यक्त केला.
दरम्यान, हा प्रदेश शाखांची पुनर्रचना करण्याचा एक भाग असल्याचे दिल्लीतील ‘आप’ नेते खासगीत बोलत आहेत. महाराष्ट्र प्रदेश शाखेला पक्षश्रेष्ठींच्या रोषाचा सामना करावा लागला आहे. याआधी योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांना बडतर्फ करण्यात आले. तेव्हापासून पक्षाच्या अन्य प्रदेश शाखांमध्ये बंडखोरी धुमसत होती. तथापि, कोणत्याही नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती न करता संपूर्ण प्रदेश शाखा विसर्जित केली जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. मयंक गांधी हे केजरीवाल यांच्यासाठी डोकेदुखी ठरले होते, अशी माहिती आहे.
‘विविध राज्यांमधील पक्ष संघटना बळकट करण्याच्या चालू प्रक्रियेंतर्गत महाराष्ट्रातील सर्व शाखा विसर्जित करण्याचा निर्णय राजकीय कामकाज कमिटीने (पीएसी) घेतला आहे. राष्ट्रीय सचिव पंकज गुप्ता हे महाराष्ट्र प्रदेश शाखेचे प्रमुख असतील आणि त्यांच्या नेतृत्वाखाली चमू राज्यात संघटनबांधणीचे काम करेल. ही नवी संरचना लवकरच आकार घेईल. या चमूला संघटनबांधणीत सहकार्य करावे, अशी पक्षाच्या सर्व सदस्यांना विनंती करण्यात येत आहे,’असे ‘आप’च्या या निवेदनात म्हटले आहे.