देशात महाराष्ट्र सर्वात ‘श्रीमंत’ राज्य; तामिळनाडू दुसऱ्या स्थानी!

By Admin | Updated: June 30, 2016 04:55 IST2016-06-30T04:55:12+5:302016-06-30T04:55:12+5:30

देशातील सर्वात ‘श्रीमंत’ राज्य असल्याची माहिती भारतीय रिझर्व्ह बँकेने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या ‘हँडबुक आॅफ स्टॅटिस्टिक्स आॅन इंडियन स्टेटस्’ या अहवालाद्वारे पुढे आली आहे

Maharashtra is the richest state in the country; Tamilnadu second place! | देशात महाराष्ट्र सर्वात ‘श्रीमंत’ राज्य; तामिळनाडू दुसऱ्या स्थानी!

देशात महाराष्ट्र सर्वात ‘श्रीमंत’ राज्य; तामिळनाडू दुसऱ्या स्थानी!

मनोज गडनीस,

मुंबई- औद्योगिकदृष्ट्या देशात कायमच अग्रेसर असलेले महाराष्ट्र राज्य देशातील सर्वात ‘श्रीमंत’ राज्य असल्याची माहिती भारतीय रिझर्व्ह बँकेने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या ‘हँडबुक आॅफ स्टॅटिस्टिक्स आॅन इंडियन स्टेटस्’ या अहवालाद्वारे पुढे आली आहे. २०१४-१५ या वर्षात महाराष्ट्राच्या राज्यातंर्गत उत्पन्नाने नऊ लाख ५० हजार कोटी रुपयांचा विक्रमी टप्पा गाठल्याचे या अहवालात नमूद केले असून, २०१३-१४ च्या तुलनेत ही वाढ ५.७ टक्के अधिक आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेने प्रसिद्ध केलेल्या या अहवालाच्या माध्यमातून विविध राज्यांतील प्रगतीची आणि तेथील आर्थिकबाबींची रंजक माहिती पुढे आली आहे. यानुसार, देशातील अर्थकारणात महाराष्ट्र हा देशातील सर्वच राज्यांपेक्षा पुढे राहिल्याचे दिसून आले आहे. राज्यांतर्गत उत्पादनाच्या वाढीमध्ये तामिळनाडू राज्य देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे तर पाच लाख कोटी रुपयांच्या उत्पन्नासह उत्तर प्रदेश तिसऱ्या क्रमांकाचे राज्य ठरले आहे. विशेष म्हणजे, तामिळनाडू राज्य श्रीमंतीच्या बाबतीत देशात दुसऱ्या क्रमांकावर असले तरी त्या राज्याचे उत्पन्न आणि खर्च यातील फारकत स्पष्ट करणाऱ्या राज्याच्या वित्तीय तुटीचे प्रमाणही देशात सर्वाधिक आहे. तामिळनाडू येथील वित्तीय तुटीचा आकडा ३१ हजार ८३० कोटी रुपये इतका आहे. वित्तीय तुटीच्याबाबतीत उत्तरप्रदेश दुसऱ्या क्रमांकावर आहे. तेथील वित्तीय तुटीचा आकडा हा ३१ हजार ५६० कोटी रुपये आहे. तर वित्तीय तुटीच्या बाबतीत महाराष्ट्राचा क्रमांक तिसरा आहे. महाराष्ट्रात वित्तीय तुटीचा आकडा ३०,७३० कोटी असल्याचे दिसून आले आहे. देशातील सर्व राज्यांच्या वित्तीय तुटीच्या आकड्याचे प्रमाण तीन लाख ३३ हजार ३३० कोटी असल्याचे दिसून आले. २०१४-१५ या आर्थिक वर्षातील हे प्रमाण असून त्या आधीच्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत यामध्ये ८.८ टक्क्यांनी घट झाल्याची नोंद आहे.
>फॅक्टरी आणि कृषी क्षेत्रातील स्थिती चिंतनीय
देशात उत्तरेकडील राज्यांत फॅक्टरीचे प्रमाण कायमच लक्षणीय राहिले आहे. मात्र, फॅक्टरी बंद होण्याच्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसले आहे. २०१०-११ या आर्थिक वर्षात उत्तरेकडील राज्यांत १२,७७० फॅक्टरी होत्या. यामध्ये घट होत २०१३-१४ मध्ये हा आकडा १२,२७८ इतका खाली आला आहे.
देशपातळीवरील आकडेवारीचा विचार करता, २०१२-१३ या आर्थिक वर्षात दोन लाख २४ हजार ५७६ या संख्येत घट होत हा आकडा त्यानंतरच्या आार्थिक वर्षात दोन लाख २२ हजार १२० इतका कमी झाल्याचे दिसते. फॅक्टरीप्रमाणेच देशातील कृषी क्षेत्रातही घट झाल्याचे दिसते. २०११-१२ या वर्षातील उपलब्ध आकडेवारीनुसार, राज्यातील पेरणी क्षेत्रात २२,०११ हेक्टरवरून २१, ८७४ हेक्टर अशी कपात झाल्याचे दिसते. कृषी क्षेत्राच्या घसरणीत महाराष्ट्रापाठोपाठ राज्यस्थानचा क्रमांक लागत असून तेथील पेरणी क्षेत्रातही लक्षणीय घसरण झाली आहे. वीज उपलब्धतेच्या बाबतीत महाराष्ट्र हे देशातील प्रथम क्रमांकाचे राज्य ठरले आहे. महाराष्ट्रानंतर गुजरातचा क्रमांक आहे. मात्र, वीजेच्या दरडोई मुबलक उपलब्धतेच्या बाबतीत दादरा, नगर-हवेली या केंद्रशासित प्रदेशांचा नंबर पहिला आहे.

Web Title: Maharashtra is the richest state in the country; Tamilnadu second place!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.